बीड मधून मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची होणार सुरुवात
पुणे – सरकारच्या उदासीनतेमुळे मराठा समाजात अतिशय उद्वेगची भावना निर्माण झालीय ! कोरोनाच्या संकटामुळे उद्रेक जरी झाला नसला तरी प्रत्येकाच्या मनात खदखद मात्र जरूर आहे.
मराठा तरुणांच्या भावनांना वाट मोकळी करण्यासाठी तसेच सरकारला भानावर आणण्या 5 जून रोजी बीड येथे “मराठा क्रांती संघर्ष मोर्चा” आयोजित करण्यात आल्याची माहिती शिवसंग्राम चे प्रदेश प्रवक्ते तुषार काकडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना तुषार काकडे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण नाकारल्याने मराठा समाजात विशेषतः विद्यार्थी, तरुण-तरुणींमध्ये अत्यंत निराशेची व संतापाची भावना निर्माण झाली. सर्वोच्च न्यायालयात समाजाची बाजू काळजीपूर्वक न मांडल्यामुळेच केवळ समाजावर हा अन्याय सहन करावा लागतोय अशी जनभावना निर्माण झालेली आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकार निदान त्यांच्या अखत्यारीत असलेले प्रलंबित विषय मार्गी लावून मराठा समाजाला धीर देण्याचा प्रयत्न करेल अशी अपेक्षा होती. जोवर आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत EWS आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला मिळण्यासाठी सरकारने पावले उचलण्याची गरज आहे. पण सरकार काहीच सकारात्मक निर्णय घेईना. इतर योजना उदा. सारथी सारख्या मराठा विद्यार्थ्यांच्या हितासाठी निर्माण झालेल्या संस्थेस स्वायत्तता व पुरेशा निधी देत ती नव्या जोमाने सुरू करायला हवी होती. पण राज्य सरकारने तिच्या नरडीलाच नख लावण्याचा प्रकार केला. आता या संस्थेला फक्त कुलूप लावणेच बाकी आहे. तरुणांना उद्योग धंदे करता यावेत म्हणून आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती झालेली होती. ते बरखास्त करण्याचे काम या सरकारने केलेय. जिल्हावार वसतिगृह, फीप्रतिपूर्ती आदी सर्व योजना बासनात गुंडाळल्यात ! यामुळे हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
