समाजभावनेतून गरजूंना सदैव मदतीचा हात द्यावा – रेणुताई गावस्कर
पुणे : परिस्थिती विलक्षण आहे; काळ मोठा कठीण आला आहे. आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून इतरांना आवर्जून मदतीचा हात दिला पाहिजे, कितीही कठीण काळ आला तरी कामावरील निष्ठा हरविता कामा नये, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका, एकलव्य न्यासाच्या प्रमुख रेणुताई गावस्कर यांनी केले.
आम्ही एकपात्री महाराष्ट्र आणि मराठवाडा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लोककलावंत आणि पडद्यामागील तंत्रज्ञांना आज जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्या वेळी गावस्कर बोलत होत्या. आम्ही एकपात्री महाराष्ट्रचे विश्वस्त वंदन राम नगरकर, मराठवाडा मित्र मंडळाचे उपप्राचार्य प्रा. रमेश पंडित, संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, आम्ही एकपात्री महाराष्ट्रचे अध्यक्ष मारुती यादव, विश्वस्त अनुपमा खरे, युवा संगीतकार सन्मित वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘शांताबाई’ फेम संजय लोंढे, गायक प्रदीप कांबळे यांच्यासह कलावंत-तंत्रज्ञांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. गावस्कर यांच्या एकलव्य न्यास या संस्थेलाही साहित्याचे वाटप करण्यात आले.
गावस्कर म्हणाल्या, सध्याच्या परिस्थितीमुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. प्रत्येकाने समाजाप्रती जाणिव जागृत ठेवली तर चित्र बदलायला वेळ लागणार नाही.
प्रा. रमेश पंडित म्हणाले, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती साधत असतानाच भाऊसाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा मित्र मंडळ अडचणीतील, गरजू लोकांना मदतीचा हात देत आली आहे. समाजकार्याद्वारे मदतीचा हात देऊन विद्यार्थ्यांपुढे एक आदर्श निर्माण करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.
सुनील महाजन म्हणाले, कोरोनामुळे गेल्या वर्ष-दीड वर्षापासून कलावंत-तंत्रज्ञांना उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे. समाजभावनेतून मदतीचा हात देण्यात येत आहे.
संजय लोंढे म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत लोककलावंतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. छोटीशी मदत सुद्धा उपजीविकेसाठी मोलाची ठरू शकते.
संस्थेचे अध्यक्ष मारुती यादव यांनी उपक्रमामागील भूमिका विषद केली. वंदन राम नगरकर यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. आभार अनुपमा खरे यांनी मानले.
