आदिवासी बांधव, रोपवाटिका मजूर, रोजंदारी कामगार यांना शिधा वाटप
वनविभागाचा पुढाकार,
पुणे दि.5- लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक अडचणींवर मात करत या वन कर्मचाऱ्यांनी उपलब्ध मनुष्यबळाच्या जोरावर रोपवाटिकेतील रोपांना जीवदान दिले असून लागवड करण्यात आलेल्या वृक्षांचे उन्हाळाच्या दाहकतेपासून संरक्षण करीत त्यांना पाणी देण्याची व्यवस्था केली आहे. उन्हाळ्याच्या कालावधीत अनेक ठिकाणी वणवा लागण्याच्या घटना घडत होत्या यापासून वृक्षांचे संरक्षण करण्यात त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीदरम्यान रोजगार मिळणे कठीण झाले होते, अशा परिस्थितीत रोजंदारीवर उपजिविका असणा-या अनेक व्यक्तींना रोपवाटिका, वृक्ष संवर्धनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला. या खेरीज कोविड-19 रोगापासून संरक्षणासाठी मास्क, सॅनीटायझर यांचे वाटप केले आहे.
ऐन उन्हाळाच्या सुरुवातीस कोविड 19 रोगाच्या रुपाने संपूर्ण जगासह भारतासमोर एक मोठे आरोग्यविषयक संकट उभे ठाकले आहे. दिवसेंदिवस कोविड 19 च्या रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस आणि सफाई कर्मचारी अहोरात्र प्रयत्न आहेत. मानवसेवेसाठी लढणाऱ्या या दूतांसारखे निसर्ग सेवेचे व्रत घेतलेले वन विभागातील अधिकारी आणि वन कर्मचारीदेखील या कठीण परिस्थितीत महाराष्ट्रभर आपली कर्तव्ये अविरतपणे पार पाडत आहेत. निसर्गाचा विशेषतः वृक्षांचा मानवी स्वास्थ्यावर होणाऱ्या अनुकूल परिणामांची सगळयांना कल्पना आहेच, याबरोबरच वृक्ष हे नैसर्गिक अडथळ्यांसारखे काम करून मानवापासून वन्यजीवांमध्ये आणि वन्यजीवांपासून मानवामध्ये प्रसार होऊ शकणा-या आजारांपासून संरक्षण करत असतात.
वृक्षसंवर्धनाबरोबरच वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी वनविभागाने अनेक उपक्रम राबविले आहेत. यामध्ये वन्यप्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देणे, अपघाताने मानवी वस्तीत आलेल्या बिबट, हरीण आणि यासारख्या इतर वन्यप्राण्यांना त्यांच्या मूळ अधिवासात सुरक्षितपणे सोडणे आणि वन्यजीव मानव संघर्ष कमी करणे, पाण्याच्या शोधात अनावधानाने विहिरीत पडलेल्या वन्य प्राण्यांची सुटका करणे, जखमी वन्यप्राण्यांवर उपचार करणे यासारख्या कामांचा समावेश आहे. याही परिस्थितीत काही समाजकंटक अवैध कामे जसे की, अवैध वृक्षतोड, वनजमिनींवर अतिक्रमण, वन्यप्राण्यांची शिकार, त्यांची तस्करी यासारखी कुत्ये करत आहेत. या कामावर देखील वनविभाग लक्ष ठेवत आहेत आणि संबंधित आरोपींवर कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
निसर्गसेवेबरोबरच सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत वनविभागाच्या अनेक कार्यालयांकडून दुर्गम भागात राहणारे आदिवासी बांधव, रोपवाटिकेत काम करणारे मजूर, रोजंदारी कामगार यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना कोरडा शिधा वाटप केला. लॉकडाऊनच्या कालावधीदरम्यान रोजगार मिळणे कठीण झाले होते, अशा परिस्थितीत रोजंदारीवर उपजिविका असणा-या अनेक व्यक्तींना रोपवाटिका, वृक्ष संवर्धनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला. या खेरीज कोविड-19 रोगापासून संरक्षणासाठी मास्क, सॅनीटायझर यांचे वाटप केले. त्याचबरोबर शासनाकडून निर्गमित केलेल्या सूचनांबद्दल समाज प्रबोधनाचे काम देखील केले.
वरील सर्व कामासाठी वने, भूकंप व पुनर्वसनमंत्री संजय राठोड, राज्यमंत्री (वने) दत्तात्रय भरणे, अतिरिक्त मुख्य सचिव, महसूल व वन विभाग (वने) मनोज कुमार श्रीवास्तव आणि, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) नागपूरचे डॉ.एन. रामबाबू यांच्या मार्गशनाखाली हे काम सुरू आहे.