येरवडा कारागृहातून पाच कैद्यांचे पलायन
पुणे, दि. 16 – पुण्यातील येरवडा कारागृहातून पाच कैद्यांनी बुधवारी मध्यरात्री पलायन केले. कारागृहातील खिडकीचे गज कापून या कैद्यांनी पळ काढला. एकाच वेळी पाच कैदी पसार झाल्याने खळबळ उडाली आहे. पळून गेलेल्या कैद्यांमध्ये मोक्का अंतर्गत अटकेत असलेल्या तिघा कैद्यांचा समावेश आहे.

अजिंक्य कांबळे, गणेश चव्हाण, अक्षय चव्हाण, देवगण चव्हाण आणि सनी पिंटो हे पाच कैदी कारागृहातून फरार झाले. यापैकी देवगण चव्हाण, गणेश चव्हाण, अक्षय चव्हाण यांच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास या कैद्यांनी खिडकीचे गज कापले आणि पळ काढला. या कैद्यांपैकी तिघे जण दौंड तालुक्यातील आहेत, तर एक कैदी पुणे शहरातील आणि एक हवेली तालुक्यातील रहिवासी आहे. या प्रकरणी दौंड, वाकड आणि हवेली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
