दिलासादायक, एका दिवसात 8 हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई : राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा ६० हजारच्या पुढं गेला आहे. मात्र, काल एकाच दिवसात ८ हजारांहून अधिक लोक बरे झाल्यानं प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. काल एकाच दिवशी तब्बल ८३८१ कोरोनामुक्त रुग्णांना घरी सोडण्यात आले असून त्यात मुंबईतील सर्वाधिक ७३५८ रुग्णांचा समावेश आहे.
तसेच आतापर्यंत राज्यभरात २६ हजार ९९७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, काल कोरोनाच्या २६८२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३३ हजार १२४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
शुक्रवारी रायगड जिल्ह्यात 52 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 हजार 8 वर पोहोचली आहे. यापैकी 556 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
दरम्यान, देशभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ६० हजारांच्या वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून सर्वोत्तोपरी मेहनत घेतली जात आहे. देशभरातील सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर, पोलीस रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.