Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

जमिनीच्या वादातून सहा जणांची निर्घृण हत्या

 

भिमातीर परिसर हादरला;  रक्तरंजित हल्ल्याची शक्यता

विजयपूर : जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर गावात शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या भीषण घटनेत सहाजणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने संपूर्ण भिमातीर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, गोविंदपूर गावात निराळे आणि गुळगी (गोलगी) कुटुंबांमध्ये अनेक दिवसांपासून जमिनीच्या वादावरून संघर्ष सुरू होता. या जुन्या वैमनस्यातूनच हा रक्तरंजित हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी गावात येऊन थेट गोळीबार केला. या थरारक हल्ल्यात सहाजणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये रेवणसिद्धप्पा निराळे, दुंडप्पा रेवणसिद्धप्पा निराळे, शिवपुत्र रेवणसिद्धप्पा निराळे, चंद्रशेखर निराळे, शब्बीर अत्तार यांच्यासह आणखी एका व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता असून, सीमाभागातील नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा गावात दाखल झाला असून, परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.
या दुहेरी नव्हे तर सामूहिक हत्याकांडामुळे विजयपूर जिल्हा हादरला असून, भिमातीर परिसरात पुन्हा एकदा रक्तपाताची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा सुरू आहे. पोलिसांकडून अधिकृत माहिती आणि मृतांची संपूर्ण ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading