विविध मनोवृत्तीनुसार देवतांची उपासना हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य
प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने श्री गणेश गीतेतील ‘भक्तीयोगा’ वर प्रवचनमालेचा चौथा दिवस
पुणे : थेट परब्रह्माची पूजा करता येत नाही, म्हणून माध्यमे निर्माण झाली. “इतके देव का?” असा प्रश्न विचारला जातो. त्याचे उत्तर भारतीय संस्कृतीच्या व्यापकतेत दडलेले आहे. प्रत्येक व्यक्तीच्या मनोवृत्तीनुसार वेगवेगळ्या देवता सांगितल्या आहेत. व्यायामशाळेत हनुमानाची पूजा केली जाते, तर शाळांमध्ये सरस्वतीची आराधना केली जाते. विकृत प्रवृत्तीचा रक्तपात करणासाठी देवी महाकालीची उपासना करतात. हेच भारतीय संस्कृतीचे वैभवशाली रूप आहे, असे प्रतिपादन प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज यांनी केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने आयोजित प्रवचनमालेत यवतमाळ वणी येथील प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज यांनी श्री गणेश गीतेतील भक्तीयोगावर चौथ्या दिवशी निरूपण केले. श्रीमंत थोरले बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि.प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात ही प्रवचनमाला सुरु आहे. अधिकमासाच्या पावन मुहूर्तावर भगवान श्री गणेशांच्या भक्तीचा मार्ग प्रशस्त करणारा श्री गणेश गीतेतील भक्तीयोग गणेशभक्तांसमोर मांडण्याकरीता प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज म्हणाले, संस्कृतमधील ‘निराश’ हा शब्द मराठीत नकारात्मक अर्थाने वापरला जातो. परंतु संस्कृतमध्ये ‘निराश’ म्हणजे ‘एकही आशा शिल्लक नसलेला’. त्यामुळे आपण सर्वांनी निराश व्हावे, म्हणजेच सर्व सांसारिक अपेक्षा सोडून द्याव्यात. जेव्हा मनुष्य अपेक्षांपासून मुक्त होतो आणि पूर्णपणे मोरयाच्या भक्तीत रमतो, तेव्हा तो उत्तरायणाच्या मार्गाला लागतो. उत्तरायणात जाणारा जीव मुक्तीचा अधिकारी मानला जातो. ही संपूर्ण रचना मोरयाने आपल्याला सांगितली आहे.
