पुण्यात २५ ते ३१ मे दरम्यान श्रीराम लागू राष्ट्रीय नाट्य महोत्सवाचे आयोजन
थिएटर प्रेमींसाठी देशभरातील उत्तम अव्यावसायिक / प्रायोगिक नाटकांची पर्वणी
पुणे : पुणेस्थित महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या वतीने दिनांक २५ ते ३१ मे या कालावधीत, श्रीराम लागू रंग-अवकाश, पुणे येथे श्रीराम लागू राष्ट्रीय नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. महोत्सवाच्या पहिल्या आवृत्तीमध्ये, विविध विचारप्रवाह, नाविन्यपूर्ण कथाकथन शैली आणि समकालीन रंगभूमीचा सतत विकसित होणारा आत्मा दर्शविणाऱ्या, अत्यंत काळजीपूर्वक निवडलेल्या नाटकांचा समावेश असेल अशी माहिती महाराष्ट्र कल्चरल सेंटर सचिव राजेश देशमुख यांनी दिली.
राजेश देशमुख म्हणाले, “अव्यावसायिक / प्रायोगिक रंगभूमीच्या श्रेणीत येणाऱ्या या सात दिवसांच्या या नाट्य महोत्सवात महाराष्ट्र, आसाम, पश्चिम बंगाल, कर्नाटक, केरळ आणि नवी दिल्ली यांसह देशातील विविध राज्यांमधील ९ वेगवेगळ्या नाटकांचे सादरीकरण करण्यात येईल. ही नाटके प्रामुख्याने हिंदी, इंग्रजी आणि ‘जीबरिश’ (अस्पष्ट / सांकेतिक) भाषेत असतील. यात प्रादेशिक भाषेचा काही अंश असला, तरीही ही नाटके प्रेक्षकांना समजण्यास अत्यंत सोपी असतील.”
“पुणे शहरात अनेक मोठे महोत्सव आयोजित केले जातात, जे देशभरातील कला-रसिकांना आकर्षित करतात; यात भारतीय शास्त्रीय संगीतासाठी ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’, चित्रपटांसाठी ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ आणि एक सांस्कृतिक महोत्सव म्हणून गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या ‘पुणे फेस्टिवल’ आदी महोत्सवांचा समावेश आहे. श्रीराम लागू राष्ट्रीय नाट्य महोत्सवाच्या माध्यमातून, आम्ही एका वार्षिक राष्ट्रीय नाट्य महोत्सवाची आणि विशेषतः अव्यावसायिक / प्रायोगिक रंगभूमीसाठीच्या महोत्सवाची जी उणीव शहरात जाणवत होती, ती भरून काढण्याचा प्रयत्न करत आहोत,” असे देशमुख यांनी नमूद केले.
अधिक माहिती देताना महोत्सवाचे संचालक प्रसाद वनारसे म्हणाले की, श्रीराम लागू राष्ट्रीय नाट्य महोत्सवाच्या या पहिल्या आवृत्तीचे उद्घाटन दिनांक २५ मे रोजी चित्रपट आणि रंगभूमी क्षेत्रातील दिग्गज कलाकार परेश रावल आणि नसीरुद्दीन शाह यांच्या उपस्थितीत करण्यात येईल. हा महोत्सव केवळ देशाच्या विविध भागांमधील प्रायोगिक रंगभूमीवर सध्या काय घडत आहे याची कल्पनाच देणार नाही, तर रंगभूमी-प्रेमींना प्रायोगिक रंगभूमीतील नवीन प्रवाह आणि कल समजून घेण्याची संधीही उपलब्ध करून देईल.
या महोत्सवात दोन प्रमुख परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. हे परिसंवाद ‘भारतीय रंगभूमीतील प्रयोगशीलतेचा प्रवास’ आणि ‘इ.स. २००० नंतर मराठी रंगभूमीतील संहितांमध्ये झालेले बदल’ यांसारख्या विषयांवर आधारित असतील. या परिसंवादांमध्ये अभिलाष पिल्लई, मणिपूरचे के. तोम्बा, नवी दिल्लीच्या अनुरूपा रॉय आणि युकी एलियास यांसारख्या रंगभूमी क्षेत्रातील काही अत्यंत नावाजलेल्या व्यक्तींचा सहभाग असेल. मराठी रंगभूमीवरील परिसंवादात केदार शिंदे आणि अभिराम भडकमकर यांसारख्या मान्यवरांचा सहभाग असेल. या महोत्सवादरम्यान, क्षेत्रातील दिग्गजांद्वारे ‘मास्टर क्लास’ सत्रांचे आयोजन देखील केले जाईल, अशी माहिती वनारसे यांनी दिली.
देशाच्या विविध भागांतून निवडकपणे निवडलेल्या नाटकांव्यतिरिक्त, येथे ‘प्लॅटफॉर्म परफॉर्मन्सेस’ (मंचावरील सादरीकरणे) आणि काही आगामी मराठी नाटकांच्या संहिता वाचनाची सत्रेही होतील.
तिकीट दर केवळ १०० रुपये प्रति नाटक इतकाच आहे. महोत्सवादरम्यान होणारे परिसंवाद आणि उद्घाटन समारंभासाठी प्रवेश विनामूल्य असेल; तथापि, त्यासाठी तिकीट खिडकीच्या माध्यमातून पूर्व-नोंदणी करणे आवश्यक आहे.
या महोत्सवादरम्यान सादर होणाऱ्या नाटकांमध्ये ‘रघुनाथ’ (आसामी), ‘नाम में का रखवो है?’ (हिंदी), ‘ डू यु नो धिस सॉंग?’ (हिंदी आणि इंग्रजी), ‘ईदन क्रीक बंगा’ (इंग्रजी), ‘ द झू स्टोरी’ (हिंदी), ‘श्योक’ (हिंदी, लडाखी, बाल्टी), ‘होम इन अ सुटकेस’ (हिंदी आणि इंग्रजी), ‘अपने घर जैसा’ (हिंदी) आणि ‘कोहू अॅन अन्थोलॉजी ऑन रेल्स’ (बहुभाषिक) या नाटकांचा समावेश आहे.
