Thursday, May 14, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

सार्वजनिक आरोग्य विभागाचा सीआयएफएफ सोबत सामंजस्य करार

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार

 

मुंबई, दि. २१ : लोककेंद्रित व अधिक परिणामकारक सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम राबविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने चिल्डरेन्स इन्व्हेस्टमेंट फंड फौंडेशन (सीआयएफएफ), युनायटेड किंगडम सोबत सामाजिक व वर्तन बदल संप्रेषण उपक्रम बळकट करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. राज्यातील राष्ट्रीय आरोग्य उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या करारासाठी विशेष पुढाकार घेतला.

या करारावर सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, उपसचिव चंद्रकांत विभुते, सीआयएफएफ कडून डॉ. हेमांग शाह व डॉ. अस्मिता जैन, तसेच आय पी आय कडून राघवेश राजन आणि अविधा यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या भागीदारीअंतर्गत सामाजिक व वर्तन बदल उपक्रम अधिक नाविन्यपूर्ण, पुराव्यावर आधारित व संशोधनाधारित पद्धतीने राबविले जाणार असून, समुदाय सहभाग व प्रभावी संवाद यावर विशेष भर दिला जाणार आहे. या सहकार्याचा उद्देश आरोग्यविषयक वर्तनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे आणि राज्यातील राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राज्यभर पोहोचविणे व त्याची परिणामकारकता वाढविणे हा आहे.

हा उपक्रम माता व बाल आरोग्य, पोषण, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि रोग नियंत्रण यांसारख्या विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीस बळकटी देईल. विशेषतः वंचित व दुर्लक्षित घटकांपर्यंत महत्त्वाचे आरोग्य संदेश व सेवा प्रभावीपणे पोहोचविण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

कराराच्या माध्यमातून आरोग्य सेवा अधिक परिणामकारक

या कराराच्या माध्यमातून आरोग्य सेवा अधिक परिणामकारक करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, संवाद माध्यमे आणि समुदाय सहभाग यांचा वापर केला जाणार आहे. विशेषतः कुपोषण, स्वच्छता, लसीकरण आणि आरोग्यदायी सवयी याबाबत जनजागृती वाढवण्यावर भर दिला जाईल.

राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये सामाजिक वर्तन बदल उपक्रम मजबूत करण्यासाठी CIFF तांत्रिक आणि धोरणात्मक सहकार्य करणार आहे. यामुळे आरोग्य योजनांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक होऊन नागरिकांच्या आरोग्यात सुधारणा अपेक्षित आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाने हा करार आरोग्य क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे सांगितले असून, या उपक्रमामुळे राज्यात दीर्घकालीन सकारात्मक सामाजिक बदल घडवून आणण्यास मदत होणार आहे.

या सहकार्यामुळे महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य संप्रेषणाला धोरणात्मक बळ मिळेल व सातत्यपूर्ण सामाजिक व वर्तन बदलाच्या माध्यमातून अधिक चांगले आरोग्य परिणाम साध्य करण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading