अहिल्यानगर महापालिका निवडणूक: मनसेचे दोन उमेदवार बेपत्ता, कुटुंबीय व पक्षात खळबळ
अहिल्यानगर प्रतिनिधी
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) दोन उमेदवार कालपासून बेपत्ता झाले असून, या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अद्याप या उमेदवारांचा त्यांच्या कुटुंबीयांशी किंवा पक्षाच्या नेत्यांशी कोणताही संपर्क झालेला नाही.
प्रभाग क्रमांक १७ मधील राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग अशी बेपत्ता मनसे उमेदवारांची नावे आहेत. विशेष म्हणजे, याप्रकरणी अद्याप कुटुंबीयांकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
दरम्यान, मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी चिंता व्यक्त करताना सांगितले की, “केडगावचा इतिहास रक्तरंजित राहिला आहे. त्यामुळे कुटुंबीय जसे काळजीत आहेत, तसेच आम्हीही गंभीरपणे चिंतीत आहोत.” तसेच, मनसे प्रमुख राज ठाकरे हे स्वतः पोलीस प्रशासनाच्या संपर्कात असल्याची माहितीही डफळ यांनी दिली.
याचवेळी, “ही मनसे आहे. आमच्या अंगावर कोणी आले, तर आम्ही शिंगावर घेऊ,” असा इशाराही सचिन डफळ यांनी दिला आहे. या घटनेमुळे निवडणूक काळात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
