डॉ अश्विनी भिडे देशपांडे यांच्या गायनाने सूर महती महोत्सवाची सुरेल सांगता
पुणे : जयपूर अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका पद्मश्री डॉ. अश्विनी भिडे देशपांडे यांच्या गायनाने तिसऱ्या सूर महती महोत्सवाची सुरेल सांगता झाली. पुण्यातील सूर महती फाऊंडेशनच्या वतीने आयोजित हा दोन दिवसीय महोत्सव स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे संपन्न झाला. डॉ. हरी सहस्त्रबुद्धे, ज्येष्ठ गायक पंडित अजय पोहनकर, सूर महती फाऊंडेशनचे रवींद्र व मानसी खांडेकर, अतुल खांडेकर व भक्ती खांडेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सांगता डॉ. अश्विनी भिडे देशपांडे यांच्या गायनाने झाली. त्यांनी यावेळी राग मारू बिहाग गात उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यामध्ये त्यांनी पै गुरुजींची ‘आज सुहाग की रात..’ ही पारंपरिक विलंबित बंदिश गायली. डॉ वीणा सहस्त्रबुद्धे आणि आडा चौतालची आठवण सांगत डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे यांना आदरांजली म्हणून डॉ. अश्विनी भिडे देशपांडे यांनी आडा चौताल मधील ‘बजाओ रे… ही बंदिश प्रस्तुत केली. यानंतर राग चंद्रकंस मध्ये मध्यलय रूपक तालात ‘सखी मुखचंद्र…’ आणि द्रुत तीन तालात आज भैलवा मिलन पी संग… या बंदिशी सादर करीत त्यांनी समारोप केला. डॉ. अश्विनी भिडे देशपांडे यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी) , ऋतुजा लाड व स्वराली जोशी (तानपुरा) यांनी साथसंगत केली. स्वानंद पटवर्धन यांनी महोत्सवाचे सूत्रसंचालन केले. महोत्सवासाठी इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, एसबीआय, विलास जावडेकर डेव्हलपर्स, सुमा, एल आय सी यांचे मुख्य प्रायोजकत्व लाभले होते.
