Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

शिक्षण क्षेत्रात देश घडविण्याची ताकद -माजी कुलगुरू प्रा.डॉ. नितीन करमाळकर

पुणे : चांगला विद्यार्थी घडला तर राष्ट्र पुढे जाईल. आपल्याला सन २०४७ पर्यंत विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र म्हणून पुढे जायचे आहे. त्याकरिता शिक्षण हेच एकमेव साधन आहे, त्यातूनच प्रगती साध्य होऊ शकते. देश घडविण्याची ताकद शिक्षण क्षेत्रात आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा.डॉ. नितीन करमाळकर यांनी व्यक्त केले.

ग्रीन वर्ल्ड व जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्रीन वर्ल्ड डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षण रत्न पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन नऱ्हे येथील जाधवर शैक्षणिक संकुलात करण्यात आले होते. यावेळी तेजराज प्रमोटर्स अँड डेव्हलपर्स चे तेजराज पाटील, आय आर एस इन्कम टॅक्स कमिशनर अजय केसरी, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, सनीज वर्ल्डचे सनी निम्हण, आमदार बाबाजीशेट काळे, समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे, बँकिंगतज्ञ किरण आहेर, आमदार विक्रम पाचपुते यावेळी उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. मुकुंद तापकीर, गोपाल खंडारे, डॉ. भरत व्हनकटे, प्राचार्य डॉ. संजीव लाटे, उपप्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे, डॉ खंडू पाठक, दिपाली सवाई, ज्ञानेश्वर दळवी, महादेव कांचन, राजेंद्र शिंदे, डॉ. दीपक पौडेल, डॉ.एच.एम. जरे यांना शिक्षण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रा.डॉ. नितीन करमाळकर म्हणाले, आजचा ज्ञान समृद्ध भारत आत्मविश्वासू, सुसंस्कृत आणि डिजिटल आहे. शिक्षणात गुरूजनांचा सन्मान आणि नवीन संस्थांची निर्मिती होत आहे. पूर्वीचे शिक्षण बदलत आहे, आणि विद्यार्थी सर्व बाजूंनी विकसित व्हावेत हा सर्वांचा प्रयत्न आहे. त्याकडे केवळ पैसा कमावण्याचे साधन म्हणून पाहू नये,

अजय केसरी म्हणाले, गुरू सर्व काही असतो. तो तयार करणारा असतो, पालकत्वाची भूमिका निभावणारा असतो. गुरूच्या महिमेबद्दल आपण जगात प्राचीन परंपरेतून सांगितले आहे. गुरू शिष्याच्या जीवनाला वेगवेगळे आयाम देतो. ज्ञान हा एक प्रकाश आहे, एक शक्ती आहे. त्यातून प्रत्येकाचा उद्धार होईल. विकसित भारत घडवण्यात गुरूची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहणार आहे,असेही त्यांनी सांगितले.

गौतम कोतवाल म्हणाले, पुस्तकी ज्ञानासोबत सर्वांगीण ज्ञान दिलेल्या गुरूजनांचा सन्मान करण्यात येत आहे. मी ५५ पुस्तकांतून १५०० उद्योजकांना समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. तळागाळातून आलेल्यांची प्रेरणा युवकांनी घ्यावी, हा यामागचा उद्देश आहे.

प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर म्हणाले, मार्गदर्शक हा खूप महत्त्वाचा असतो. विद्यार्थी हे आदर्श व्यक्ती घडले पाहिजेत. त्यांनी आपल्या-आपल्या क्षेत्रात यशस्वी व्हायला हवे. व्यास आणि कलाम ही गुरु-परंपरा आहे, त्यात आपणही एक मणी व्हायला हवे. संत म्हणजेच गुरु.पूर्वीच्या काळी संत हे गुरूचेच काम करीत असत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading