सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली नुकसान भरपाईची रक्कम अत्यंत अपुरी – उद्धव ठाकरे
छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी
अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानाच्या प्रमाणानुसार राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली नुकसान भरपाईची रक्कम अत्यंत अपुरी असल्याचे मत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. ते मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत.
सध्या आमच्या हातात तुम्हाला देण्यासारखे काही नाही. मात्र, तुमची साथ देण्यासाठी, तुम्हाला आधार देण्यासाठी मी इथे आलो आहे. या संकटाच्या परिस्थितीतून आपल्याला बाहेर यायचे आहे. त्यासाठी धीर धरा आणि कृपा करून कोणतेही वेडेवाकडे, टोकाचे पाऊल उचलू नका, असे भावनिक आवाहन ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केले.
सरकारने जाहीर केलेली नुकसान भरपाईची रक्कम ही सन 2023 च्या निकषानुसार आहे. शेतकऱ्यांना ती पुरेशी नाही. सरसकट 50 हजार रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई मिळावी ही शेतकऱ्यांची मागणी आहे. ही मागणी रास्त असून ती सरकारपर्यंत पोहोचवण्याचे काम आपण निश्चितपणे करू, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली आहे.
