Sunday, May 31, 2026
ENTERTAINMENTLatest News

सुरु होतोय प्रेम आणि भक्तीचा नवा प्रवाह इंद्रायणी !

संपूर्ण महाराष्ट्राला एक वर्षाआधी जिने तिच्या मार्मिक प्रश्नांनी अचंबित केले, आपल्याला विचार करायला भाग पाडले … अशी निरागस, गोंडस आणि निष्पाप इंदू अख्या गावाची म्हणजेच विठूच्या वाडीची नाही तर आपल्या सगळ्यांचीच लाडकी बनली. निरागसपण जोपासणारी तरीही खोडकर अशी इंदू आपल्या सर्वांना भावली. इंदूची लहान वयातील समज, तिचा युक्तिवाद आणि विठू रायावरील निस्सीम भक्ती हे आपण सगळ्यांनीच पाहिलं. अनेक संकटं आणि अडथळे पार करताना तिला विठू रायाची साथ लाभली, तो तिचा पाठीराखा बनला… तिची फँटया गॅंग आणि व्यंकू महाराज यांच्या खंबीर साथीने इंदूने त्यानां सहजपणे पार केलं. इंदूच्या सुख दुःखात, तिच्या आनंदाच्या क्षणात या संपूर्ण प्रवासात आपण सगळेच साक्षीदार होतो. पण, आता अनेक वर्ष सरून गेली आहेत… बऱ्याच गोष्टी विठूच्या वाडीत घडल्या आहेत. जसा एखाद्या गोष्टीत नवा अध्याय सुरु होतो अगदी तसंच इंदूच्या आयुष्यात देखील झाले आहे. इंदूच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा आता आला आहे, कारण आपली इंदू मोठी झाली आहे. आता नव्या आव्हांनाना सामोरं जाण्यासाठी विठुरायाच्या साक्षीने इंदू सज्ज झाली आहे. तेव्हा आपण सगळे तिच्या या प्रवासाचे साक्षीदार होऊयात. सुरु होतोय प्रेम आणि भक्तीचा नवा प्रवाह इंद्रायणी 10 मार्चपासून संध्या. ७.०० वा. कलर्स मराठीवर. मोठ्या इंदूची भूमिका साकारणार आहे कांची शिंदे तर गोपाळच्या भूमिकेत स्वामींनी मालिकेतून आपल्या भेटीस आलेला चिन्मय पटवर्धन आणि अधू निशांत पवार असणार आहे. याचसोबत आनंदीबाई म्हणजेच अनिता दाते, व्यंकू महाराज म्हणजेच स्वानंद बर्वे देखील मालिकेचा भाग असणार आहेत.

महाराष्ट्रात संत परंपरेची मोठी परंपरा आहे. याच संस्कारात वाढलेल्या इंद्रायणीने व्यंकू महाराजांच्या मार्गदर्शनाखाली बाल कीर्तनकार म्हणून नावलौकिक मिळवला. आपल्या सातत्यपूर्ण प्रवचनांमधून ती कीर्तन परंपरेला जिवंत ठेवत आहे. पण दहा वर्षात अश्या अनेक घटना घडल्या ज्यामुळे इंदूचे जग बदललं. विठूच्या वाडीत आनंदीबाईंचं प्रस्थ वाढलं आहे. विठूची वाडी, तिथलं मंदिर आणि इंदूच्या कीर्तनाच्या व्यवहारावर वर्चस्व गाजवत आहे, जणू पैसे कमवण्याचे मुख्य साधनच बनवलं आहे. व्यंकू महाराज मात्र कुटुंबातील दु:खद घटनांमुळे मंदिर व्यवस्थापनातून पूर्णपणे बाजूला झाले आहेत. व्यंकू महाराज सगळ्यांपासूनच अलिप्त राहायला लागले आहेत. आपल्या वडीलांशी गोपाळने अबोला धरला आणि गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे इंदू – गोपाळ – अधू यांच्या मैत्रीचं त्रिकूट तुटून गेलं. या सगळ्या आव्हानांमधूनही इंदूचा सकारात्मक दृष्टिकोन आणि तिचा दृढ विश्वास कायम आहे. आपल्या कीर्तनांमधून ती आनंद पसरवत आहे. दहा वर्षांनंतरदेखील विठूच्या वाडीत इंदूचं स्थान मात्र कोणीच हलवू शकलं नाही. आनंदीबाईंचा स्वार्थ त्यांचा पैसे कमविण्याचा हव्यास अजूनही तेवढाच आहे पण आता त्यांचा डोळा इंदूच्या मालमत्तेवर आहे. ती मिळविण्यासाठी त्या कोणता नवा प्लॅन करणार ? कशी ती प्रॉपर्टी स्वतः च्या नावावर करणार ? गोपाळ परत विठूच्या वाडीत येणार का ? आणि आला तर मालिकेत कुठलं नवं वळण पाहायला मिळणार ? इंदू, अधू आणि गोपाळ यांची आधीची घट्ट मैत्री आता कुठलं नवं वळण घेईल? अधू इंदूला आपल्या मनातील भावना सांगू शकेल ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मालिकेत मिळतीलच.

मोठ्या इंदूची भूमिका साकारणारी कांची शिंदे म्हणाली, “आयुष्यात एकदातरी मुख्य भूमिका करायचे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असते. जेव्हा इंद्रायणी हि मालिका आली होती तेव्हाच मला असं वाटलं होतं कि जर पुढे मागे हि मुलगी मोठी झाली तर हिचं पात्र साकारण्याची संधी मला मिळावी अशी प्रार्थना मी केली होती. तेव्हापासून मी मालिका बघायला सुरुवात केली होती. विठुरायासोबत माझं एक अनोखं नातं तयार झालं. या पात्रासाठी मी खूप मेहेनत घेतली आहे. मी लोककला शिकले आहे. भारूड, जागरण, गोंधळ, कीर्तन या सगळ्यांची ओळख मला लहानपानापासून झाली आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव माझ्यावर आहे. माझं गायन देखील त्याचप्रकारचं आहे. गायनात माझा जो बाज आहे तो मला या मालिकेत नक्कीच मदत करत आहे. कीर्तन करताना मला उपयोगी पडतो आहे. किर्तनाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलत चालला आहे. मी खूप शिकते आहे, एक माणूस म्हणून पण माझ्यात बदल होतो आहे. इंदू मध्ये किती आपलेपणा आहे, विठू रायाबद्दलची तिची जी भक्ती आहे ती वाखाण्याजोगी आहे. माझ्या मध्ये पहिले देखील भक्ती होती पण या मालिकेमुळे, workshop मुळे कुठेतरी मला विठूराया नव्याने भेटला आहे असं मला वाटतं आहे. माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे कारण कुठेतरी मी वारकरी संप्रदायाला प्रेसेंट करते आहे. लहान इंदू खूपच निरागस आहे ती काहीच ठरवून करत नाही. ती काही न ठरवता करते ते खूपच खास आहे त्यामुळे तिच्या काही लकब बघण्याचा प्रयत्न करते आहे, ती कशी बोलते, तिचा खोडकरपणा सगळं बघते आहे मी. जी जितकी natural आहे तितकंच natural राहण्याचा मी प्रयत्न करणार आहे”.

मालिकेचे दिगदर्शक विनोद लव्हेकर म्हणाले, “छोट्या इंद्रायणीला शोधण्याहुन मोठ्या इंद्रायणीला शोधण्याची मोहीम खुपचं कठीण होती कारण हि, तिन्ही लहान मुलं माझ्यासमोर होती त्यामुळे त्यांचे मोठं रूप शोधणं खूप कष्टाचं होतं. कोणा एका व्यक्तीसारखं दुसरं व्यक्ती असणं कठीण असतं. आम्ही महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये मिळून साधारणतः ७५० ते ८०० ऑडिशन घेतल्या. आता मोठी इंद्रायणी शोधणे अवघड का होतं कारण छोट्या इंदूमधला गोडवा तिच्यात येणं कठीण होतं तर मग त्याला पर्याय काय तर निरूपण, किर्तन संस्कृती याबद्दल माहिती हवी, आस्था हवी आणि ते सादर करण्याची तिची इच्छा व कुवत हवी. कांचीला लोककलांचा अभ्यास आहे, तिच्या आवाजाचा पोत तसा आहे. इंद्रायणी मालिका हि एका किर्तनकार मुलीच्या प्रवासाची गोष्ट आहे. हळूहळू तो प्रेक्षकांसमोर उलगडत जाईल. तेव्हा तुमचं प्रेम असंच मालिकेवर असू द्या.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading