राज्यघटनेत नमूद केलेल्या मुल्यांचा वारसा जतन व संरक्षित केला पाहिजे – अरविंद शिंदे
पुणे : काँग्रेस कमिटीतर्फे आज देशाच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. त्याचबरोबर पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने संविधानाच्या रक्षणार्थ ‘जय बापू’, ‘जय भीम’, ‘जय संविधान अभियान’ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘भारताचे संविधान, सामाजिक न्याय व समानतेच्या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्ष नेहमीच वचनबध्द राहिला आहे आणि या पुढेही राहील. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा वारसा, राज्यघटनेचे संरक्षण व संवर्धन या बाबत असलेली आवश्यकता लक्षात घेवून संविधान वाचविण्यासाठी देशव्यापक जनसंपर्क मोहिम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आपल्या राज्यघटनेत नमूद केलेल्या मुल्यांचा वारसा जतन व संरक्षित केला पाहिजे. मागील काही दिवसांपूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल भर संसदेत केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे काँग्रेस पक्षाने अमित शाह यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. याकरीता सर्वत्र पत्रकार परिषदा घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ देशभरात ‘सन्मान मोर्चा’ देखील काढण्यात आला. देश उभारणीसाठी आणि देशाचे जगात नावलौकिक वाढवण्यासाठी सदैव पुढे असणाऱ्या या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा मी एक भाग आहे याचा मला अभिमान आहे. हजारो वर्षाच्या हुकूमशाहीला खिंडार पाडत काँग्रेसने देशाला लोकशाही दिली. ही लोकशाही बनवण्यात जरी योगदान काँग्रेसचे असले तरीही ती टिकवणे ही जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वांची आहे. संविधानाने दिलेले हक्क कायम राहावेत, हाच व्यवस्थेचा व राज्य व्यवस्थेचा अंतीम हेतु असला पाहिजे असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होते. राज्य घटनेचा मानसन्मान करणे हेच खरे प्रजासत्ताक दिनाचे कर्तव्य आहे. हा महत्वाचा संदेश देऊन सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. प्रजासत्ताक दिन चिरायू होवो…’’
यानंतर हृदयरोग तज्ञ डॉ. राहुल सावंत यांनी काँग्रेस भवनला भेट दिली व काँग्रेस पक्षाबरोबर काम करण्याची इच्छा दर्शविली यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करून त्यांचा शाल, तिरंगी मफलर व पुष्पगुष्छ भेट देवून सत्कार केला. यावेळी डॉ. राहुल सावंत यांनी आपले काँग्रेस पक्षाविषयी आपले विचार प्रकट केले. काँग्रेस पक्षाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान हे कधीही विसरू शकणार नाही. संविधान वाचायचे
असेल, देशाचे अस्तित्व टिकवायचे असेल तर काँग्रेस पक्षाच्या पाठिशी सर्वांनी ठामपणे उभे राहिले पाहिजे.
यावेळी माजी आमदार मोहन जोशी, दिप्ती चवधरी, ॲड. अभय छाजेड, लता राजगुरू, अजित दरेकर, रफिक शेख, अविनाश बागवे, सुजाता शेट्टी, दत्ता बहिरट, गोपाळदादा तिवारी, अनिल सोंडकर, सौरभ अमराळे, कैलास गायकवाड, मेहबुब नदाफ, भुजंग लव्हे, राजेंद्र भुतडा, सुनिल मलके, राज अंबिके, विनोद रणपिसे, गुलाम हुसेन खान, शिवानंद हुलावळे, ॲड. रमेश पवळे, ॲड. नंदलाल धिवार, राजेंद्र भुतडा, विशाल मलके, बळिराम डोळे, द. स. पोळेकर, ब्लॉक अध्यक्ष सुजित यादव, अक्षय माने, राजू ठोंबरे, विशाल जाधव, गणेश गुगळे, अनुसया गायकवाड, सिमा सावंत, प्राची दुधाने, सुंदर ओव्हाळ, अनिता धिमधिमे, इंदिरा अहिरे, भारती कोंडे, शारदा वीर, ज्योती परदेशी, सेवादलाचे प्रकाश पवार, सुरेश नांगरे, हर्षद हांडे, मतीन शेख, शाम काळे, ॲड. बाळासाहेब बाणखेले, आदींसह असंख्य काँग्रेसजण उपस्थित होते.
