श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान तर्फे अष्टधान्यतुला
पुणे : श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान तर्फे मराठा शौर्य दिनानिमित्त पानिपत वीरांना शौर्यवंदना देण्याकरीता लालमहाल येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आजच्या काळात स्वतःच्या कर्तुत्वावर शौर्य गाजवणाऱ्या तीन वीरांची अष्ट धान्य तुला करण्यात आली. सरसेनापती हंबीरराव मोहिती रथोत्सव समितीचे प्रमुख शिरीष मोहिते, वेदना निवारक तज्ञ व संशोधक डॉ. किर्ती पवार (बारामती) आणि उद्योजक मानसिंग बाळासाहेब पवार (छत्रपती संभाजी नगर) यांची अष्टधान्यतुला करण्यात आली.
कार्यक्रमाला ज्येष्ठ विचारवंत उल्हास पवार, शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, कात्रज दूध डेअरीच्या संचालक केशर पवार, सुपे येथील संस्थानिक संग्रामसिंह राजे पवार, मलठण येथील संस्थानिक उदयसिंह राजे पवार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे अध्यक्ष सुनील रासने व पवार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सागर पवार यांसह महाराष्ट्रातील पदाधिकारी व पवार घराण्यातील बांधव आणि भगिनी उपस्थित होते.
कार्यक्रमात युवा उद्योजक सचिन पवार, युवा गायिका राजेश्वरी पवार, मोडी लिपी अभ्यासक मनोज उर्फ अशोक सरपाटील (पवार) यांना धार पवार कुलभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे सन्मानाचे स्वरुप होते. शस्त्रपूजन, ध्वजपूजन,लाठी काठी आदी विविध कार्यक्रमाद्वारे पानिपतवीरांना अभिवादन करण्यात आले. पानिपत ही मराठयांची व्यथा नाही, तर आमची शौर्यगाथा आहे, असे अभिमानाने सांगत पानिपत युद्धातील वीरांना व पानिपतवीर श्रीमंत महाराजा यशवंतराव पवार यांच्या वंशजांनी नमन केले. यावेळी दिनदर्शिकेचे प्रकाशनही झाले.
सागर पवार म्हणाले, मराठयांनी केवळ मराठी साम्राज्यासाठी नव्हे, तर राष्ट्राच्या रक्षणासाठी जीवन समर्पित केले. मराठी मातीतील मुलांकडे हा राष्ट्रनिष्ठेचा संस्कार वारश्यानेच आला आहे. श्रीमंत महाराज यशवंतराव पवार यांच्या नेतृत्वाखाली अनेक मोहिमा आखत भगवा झेंडा अटकेपार नेण्याकरीता लढा देण्यात. दि.१४ जानेवारी १७६१ पानिपत येथील लढाईमध्ये श्रीमंत महाराज यशवंतराव पवार यांच्या नेतृत्वाखाली पवार सैन्याने मोठा लढा दिला, अहमद शहा अब्दालीचा सरदार अताई खान हा पानिपत मध्ये येणारी रसद ही बाहेरच्या बाहेर लुटत होता त्यामुळे सैन्यांवर उपासमारीची वेळ येत होती, ही गोष्ट ध्यानात ठेवून लढाईमध्ये जेव्हा श्रीमंत महाराज यशवंतराव पवार यांच्या नजरेला अंबारी वरील अताई खान दिसताच यशवंतरावंनी स्वतःच्या घोड्यावरून त्याच्या सैन्याचे कडे तोडून त्याला अंबारी वरती उडी मारत मारले व त्याला मारताना यशवंतरावंनी पवार हू तो चढके ही मारुंगा अशी घोषणा केली. या युद्धात महाराजा यशवंतराव पवार कामी आले, त्यांना अभिवादन करण्याकरता अभिवादन कार्यक्रम होता.
