Monday, June 8, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नवे नेतृत्व विकसित करण्याचा प्रयोग होणार

मुंबई: प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह महाविकास आघाडीच्या दारुण पराभवानंतर पक्ष प्मुख शरद पवार यांनी पक्षात आमूलाग्र बदल घडविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार स्थानिक पातळीपासून राज्याच्या पातळीपर्यंत नेतृत्वात बदल घडवून नवे नेतृत्व विकसित करण्याचा प्रयोग केला जाणार आहे. 

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाला केवळ दहा जागांवर समाधान मानावे लागले. हा पराभव महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांच्या जिव्हारी लागला आहे. मात्र, या पराभवाने थबकून न जाता पक्षात पुन्हा नव्याने प्राण ओतण्याचे शरद पवार यांचे प्रयत्न आहेत. 

पक्षातील युवक, युवती, विद्यार्थी, महिला या सर्व विभागांचे अध्यक्ष व पदाधिकारी बदलले जाणार आहेत. स्थानिक पातळीवर देखील पदाधिकाऱ्यांमध्ये बदल करून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आठ आणि नऊ जानेवारी रोजी यशवंतराव चव्हाण सभागृहात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सर्व विभागांचे प्रमुख, आमदार, खासदार यांची बैठक आठ तारखेला होणार आहे तर शरद पवार हे नऊ तारखेला सर्व जिल्हाप्रमुख आजी, माजी आमदार, खासदार यांच्याशी चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतरच नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. 

प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील राहणार की जाणार?

पक्षातील बंडाळीनंतर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासारखे शरद पवार यांचे विश्वासू नेतेही अजित पवार यांच्याबरोबर गेले तरीही जयंत पाटील शरद पवार यांच्याशी निष्ठावान राहिले. दीर्घ काळापासून जयंत पाटील भाजपत जाण्याची चर्चा झडत असली तरीही आतापर्यंत तरी त्या वावड्याचं ठरल्या आहेत. पक्षात मोठे फेरबदल घडवून आणताना पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर जयंत पाटील कायम राहणार की ही जबाबदारी देखील नव्या नेत्याच्या खांद्यावर दिली जाणार, याबद्दल उत्सुकता आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading