भगवंताची सेवा करत राहणे आवश्यक – पूज्य राजन जी महाराज
पुणे : भगवंताची सेवा करुन आपण जेव्हा भगवंताला काहीच मागणार नाही. त्यानंतर कधी ना कधी भगवंत कृपा करुन त्याची भक्ती आपल्याला प्रदान करेल. त्यामुळे भगवंताची सेवा करत राहणे आवश्यक आहे, असे पूज्य राजन जी महाराज यांनी सांगितले.
श्री गौड ब्राह्मण समाज, श्री चारभुजानाथ मंदिर राम कथा समितीतर्फे श्रीराम कथा प्रेम यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रकूट धाम, वर्धमान लॉन्स समोर, बिबवेवाडी कोंढवा रस्ता येथे आयोजित कथा सोहळ्यात सातव्या दिवशी प्रेममूर्ती पूज्य संत श्री प्रेमभूषणजी महाराज यांचे कृपापात्र पूज्य राजन जी महाराज यांनी निरूपण केले.
पूज्य राजन जी महाराज म्हणाले, जिथे खूप नियम असतात तिथे प्रेम संपते. जिथे प्रेम असते तिथे नियम संपून जातात. परमेश्वराला खूप नियम आवडत नाहीत. जिथे नियम अधिक असतात तिथे भगवंत पेचात पडतात. भक्ताचे प्रेम बघून भगवंत आपले नियम बदलत असतो.
भगवंताच्या चरणाशी सहज प्रेम तोच करु शकतो, जो सहज आहे. ज्या प्रेमाला करावे लागत नाही, तेच सहज प्रेम असते. ज्या कार्याला करावे लागते ते कार्य सोडण्याचे भय असते. जे कार्य आपोआप घडते ते कार्य संपण्याचे भय नसते. भगवंताच्या भक्तीचा अभिमान नको, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कथा सोहळ्याचे आयोजन दि. २२ डिसेंबर पर्यंत दररोज दुपारी ३ ते सायंकाळी ७ यावेळेत चित्रकूट धाम, वर्धमान लॉन्स समोर, बिबवेवाडी कोंढवा रस्ता येथे करण्यात आले आहे. श्रीराम कथा प्रेमयज्ञ सोहळ्यात श्री भरत चरित्र, श्री शबरी प्रेम, सुंदरकाण्ड आणि श्री राम राज्याभिषेक याविषयी पूज्य राजनजी महाराज हे निरूपण करीत आहेत. सोहळ्याकरिता प्रवेश विनामूल्य असून रामभक्तांनी मोठया संख्यने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.
