Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्वेष मुक्त महाराष्ट्रासाठी राबवले जाणार ‘सजग रहो’ अभियान 

पुणे : विकसित महाराष्ट्रासाठी ‘विद्वेषमुक्त महाराष्ट्रा’चा संकल्प विविध संस्थांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत करण्यात आला. महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्थांच्या पुण्यात झालेल्या बैठकीत विकसित महाराष्ट्रासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत याच अनुषंगाने जनतेपर्यंत ‘सजग रहो’ या अभियानाच्या माध्यमातून पोहोचण्याचा निर्धार केल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. ‘सजग रहो’ अभियानाच्या वतीने काल यासंदर्भात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते क्षितिज टेक्सास गायकवाड, पद्मश्री गिरीश प्रभुणे, दलित साहित्याचे अभ्यासक डॉ. धनंजय भिसे, ॲड. अभिजित देशमुख यांनी संबोधित केले.
या बैठकीसंदर्भात आणि त्यातील मुद्द्यांबाबत पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. बैठकीला महाराष्ट्रातील विविध ६५ संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यात ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री नामदेवराव कांबळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रमुणे, मातंग साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे, दलित चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक-अध्यक्ष मिलिंद कांबळे, ज्येष्ठ माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, सुदर्शन वाहिनीचे संस्थापक सुरेश चव्हाणके, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते क्षितिज गायकवाड, ज्येष्ठ माध्यमकर्मी डॉ. उदय निरगुडकर, शिवसृष्टीचे अध्यक्ष जगदीश कदम, विवेक विचार मंचचे प्रदीपदादा रावत यांच्यासह दोनशे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झालेले होते, अशीही माहिती यावेळी देण्यात आली.
विकसित भारताची संकल्पना मांडून त्या दिशेने गेल्या १० वर्षांत दमदार वाटचाल सुरू आहे. महाराष्ट्रात मात्र या वाटचालीला रोखण्यासाठी विविध मार्गांनी बुद्धिभेद करण्यात येत आहे. हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी महाराष्ट्रात शिवछत्रपतींनी अठरापगड जातींना एकत्र आणले आणि विविध पातशाह्यांना आस्मान दाखविले, त्याच महाराष्ट्रात जातीय विद्वेष जाणीवपूर्वक पोसण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. देशातील सर्वाधिक प्रगतिशील असलेल्या महाराष्ट्रासमोरचे हे आव्हान पेलण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांना सक्रिय भूमिका घेणाची वेळ आलेली आहे, अशी भावना या बैठकीतील विविध प्रतिनिधींनी व्यक्त केली.
गेल्या दहा वर्षांत अनुसूचित जाती-जमाती, आदिवासी आणि मागास समाजासाठी सर्वाधिक योजना आणण्यात आल्या आहेत आणि त्या य़शस्वीपणे राबविल्या गेल्या. परंतु या समाजाला संभ्रमित करण्यासाठी सातत्याने समाजातील काही राजकीय पक्षांच्या व्यक्ती आणि दांभिक सामाजिक संस्था पूर्ण ताकदीनिशी प्रयत्नात आहेत. त्यांचा हा प्रयत्न लोकसभा निवडणुकीत काही प्रमाणात यशस्वी झालेला आहे, परंतु देशाचे ग्रोथ इंजिन असलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या हे इरादे उधळून लावले पाहिजेत, यावरही बैठकीत एकमत व्यक्त करण्यात आले. महाराष्ट्रविरोधी आणि हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठीच विचार करणार्‍या शक्तींना रोखण्यासाठी समाजाशी संवाद साधण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
‘श्रेष्ठ महाराष्ट्र – विकसित महाराष्ट्रा’चा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात जनजागृतीसाठी ‘सजग रहो’ हे अभियान सुरु करून ते राबवण्याचा महत्वाचा निर्णयही या वेळी घेण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading