छत्रपती संभाजी राजे यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचं निवडणूक चिन्ह ठरलं
मुंबई : छत्रपती संभाजी राजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या स्वराज्य संघटनेला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्र स्वराज्य पक्ष (Maharashtra Swarajya Party) या नावाने हा पक्ष विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती या प्रतिस्पर्ध्यांमध्ये खळबळ माजली आहे. महाराष्ट्र स्वराज्य पक्ष इतर पक्षांना बरोबर घेऊन तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या दृष्टीने चाचपणी करीत आहे. पेनाचे निब हे चिन्ह या पक्षाला मिळाले आहे.
छत्रपती संभाजीराजे हे छत्रपती शिवरायांचे वंशज असून कोल्हापूरच्या गादीचे युवराज आहेत. राज्यात सध्या कळीचा मुद्दा असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात छत्रपती संभाजीराजे आघाडीवर आहेत. त्यामुळे त्यांना मराठा समाजाचा मोठा पाठिंबा मिळू शकतो. मराठा समाज महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रभावी घटक आहे. हा समाज संघटितपणे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या पाठीशी उभा राहू शकतो. त्यामुळे हा पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावण्याची शक्यता आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू आणि छत्रपती संभाजीराजे एकत्र येण्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत. हे दोन्ही नेते समाजात प्रभावी असल्याने ते एकत्र आल्यास राज्याच्या राजकारणात नवी समीकरणे जुळवू शकतात. त्याचप्रमाणे महाविकास आघाडी आणि महायुतीला पर्याय देण्यासाठी छोट्या पक्षांनी एकत्र येऊन तिसरी आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला इतर सर्व छोट्या पक्षांची साथ मिळाली तर राज्याच्या राजकारणात उलटापालट होऊ शकते.
