मुंबई पालिकेचा अनागोंदी कारभार,नागरिकांचा पालिका अधिका-यांवर संताप
मुंबई – आरोग्य, रस्ते, कचरा, अस्वच्छता, शौचालय तसेच वाहतुक समस्याने घाटकोपरकरांना ग्रासले असून पालिकेच्या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याबाबत ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी उपायुक्त संतोष कुमार धोंडे यांच्या समवेत अधिकारी तसेच नागरिकांची एक बैठक घाटकोपर एन वार्ड मध्ये घेऊन पालिका अधिका-यांना धारेवर धरले. या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करुन नागरिकांचे प्रश्न सोडवावे अशा सुचना त्यांनी अधिका-यांना केल्या.
घाटकोपर पुर्व पश्चिम भागात सर्वात जास्त झोपडपट्टीधारक राहतात. या भागातील नागरिकांनी या बैठकीत त्यांच्या समस्या मांडल्या. पाण्याची सर्वात जास्त समस्या या परिसरात असून अनेक भागात तर पाणी केवळ अर्धा तासच येत असल्याने नागरिकांना पाणी मिळत नसल्याची सर्वात जास्त तक्रारी या बैठकीत करण्यात आल्या. त्याच बरोबर आरोग्य, रस्ते, कचरा, अस्वच्छता, शौचालय तसेच वाहतुक समस्यांबाबत नागरिकांनी तक्रारी मांडल्या. याबाबत पालिकेचे अधिकारी कार्यवाही करीत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळे पालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून पालिका अधिका-यांच्या विरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. या सर्व समस्यांवर तात्काळ कार्यवाही करण्यात य़ावी, अशा सुचना खा. संजय दिना पाटील यांनी पालिका अधिका-यांना केल्या.
मुंबई मनपाच्या घाटकोपर येथील एन वार्ड विभागात झालेल्या या बैठकीत खा. संजय दिना पाटील तसेच राष्ट्रवादी पक्षाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव, विभाग प्रमुख सुरेश पाटील शिवसेनेच्या नगरसेविका स्नेहल मोरे, माजी नगरसेवक संजय भालेराव तसेच घाटकोपर मधील नागरिक आणि पालिकेच्या सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
