तब्बल 10 तासांच्या ठिय्या नंतर बादलापूरमध्ये आंदोलक पालकांवर पोलिसांचा लाठीचार्ज; नेमकं प्रकरण काय आहे?
मुंबई : बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैगींक अत्याचार घडल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना 12 ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी पालकांना संघर्ष करावा लागला. यामुळं बदलापूरच्या नागरिकांनी आज आक्रमक भूमिका घेत सकाळपासून रेल्वे स्टेशनवर आंदोलन सुरु केलं होत. पोलिसांनी नागरिकांना रेल्वे रुळांवरुन बाजूला होण्याचं अनेकदा आवाहन केलं; मात्र आक्रमक पालकांनी आपोरीला ‘फाशीची शिक्षा द्या’ ही मागणी लावून ठेवली. शेवटी तब्बल 10 तासांच्या ठिय्या नंतर आंदोलक पालकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला अन् रेल्वेट्रॅक रिकामा करण्यात आला आहे. मात्र स्टेशन मधून बाहेर पडताना पालकांनी बाहेरील बाजूस असलेल्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
मुलींना वॉशरूमला नेण्याचे काम होतं आरोपीवर
बदलापूर मधील नामांकित शाळेत चार वर्षांच्या दोन लहान मुलींवर अत्याचार 12 ऑगस्ट रोजी झाला होता. या प्रकरणातील आरोपी सदर शाळेत 1 ऑगस्ट रोजी कंत्राटी पद्धतीनं कामावर रुजू झाला होता. त्याच्यावर या लहान मुलींना वॉशरूमला नेण्याचे काम सोपवण्यात आलं होतं. १२ व १३ ऑगस्ट रोजी आरोपी अक्षय शिंदे यानं या दोन लहान मुलींचं लैंगिक शोषण केल. सदर घडलेला प्रकार एका मुलीन आपल्या आजोबांना सांगितला. त्यानंतर एका खाजगी डॉक्टरांकडून या दोघींची तपासणी करण्यात आली. अन् आता पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर शाळा व्यवस्थापनानं माफीनामा सादर केला असून मुख्याध्यापकांसह चार जणांवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली आहे.
FIR दाखल करायला लागले तब्बल १२ तास
या घटनेनंतर पालकांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामध्ये दिरंगाई झाल्याचं समोर आलं. पीडित मुलीच्या नातेवाईकांना पोलीस स्टेशनला 12 तास वाट पाहायला लागली. यानंतर आज बदलापूरमध्ये नागरिक आक्रमक झाल्याचं समोर आलं आहे.
जमावाकडून शाळेची तोडफोड
या घटनेला तब्बल आठ दिवस होवून देखील शाळा प्रशासनाकडून या प्रकरणाची दखल घेतली जात नव्हती. तेव्हा आज संतप्त पालक सकाळी सहा वाजल्या पासूनच शाळेच्या आवारात आंदोलन करत होते. तर सकाळी दहाच्या सुमारास काही पालक रेल्वे रोको करण्यासाठी बदलापूर स्थानकात पोहोचले. पण काही आंदोलक पालक शाळेतच थांबले. यावेळी त्यांनी शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
