वक्फ बोर्ड विधेयकाबाबद उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका
मुंबई: वक्फ कायदा सुधारण्याच्या नावाखाली वक्फ बोर्डाच्या जमिनी हडप करण्याचा केंद्र सरकारचा डाव असेल, किंबहुना कोणत्याही धर्मस्थानांच्या मालमत्ता हडप करण्यासाठी प्रयत्न केले जात असतील तर आम्ही असे वेडेवाकडे काहीही होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलताना केंद्र सरकारला दिला.
अयोध्येची जमीन कोणत्या ट्रस्टला दिली त्याची चौकशी केली जाणे गरजेचे आहे. केदारनाथ देवस्थानात सोन्याची चोरी झाली. त्याचे पुढे काय झाले? सरकारचे काही चालत नाही म्हणून लोक मला प्रश्न विचारतात. म्हणून माझे सरकारला आव्हान आहे, ही निवडणूक आत्ताच घ्याव्यात.
समाजात आगी लावण्यासाठी…
केंद्रं सरकारने केवळ समाजात आगी लावण्यासाठी वक्फ कायदा सुधारणा विधेयकासाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याचे नाटक केले आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला. नोटाबंदीचा निर्णय घेताना तुम्ही आम्हाला विचारले होते का? तुमच्याकडे बहुमत असताना वक्फ कायदा सुधारणा विधेयक थेट मंजूर का नाही करून घेतले, असा सवाल ठाकरे यांनी सरकारला केला.
…म्हणून मुस्लिमांचे मतदान आम्हाला
राज्यात आणि देशभरात सत्ताधारी समाजामध्ये विद्वेश निर्माण करीत आहेत. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम आणि बौद्ध समाजाने आम्हाला भरभरून मतदान केले. कोरोना काळात आपण त्यांचे प्राण वाचवले. समाज भयभीत झालेला असताना आपण त्यांना आधार दिला. एकाही नागरिकाला येथून बाहेर जाऊ दिले जाणार नाही, हे मी ठणकावून सांगितले. त्यामुळे त्यांनी आपल्याला मतदान केले, असा दावाही ठाकरे यांनी केला.
