काँग्रेस पक्ष करणार खासदारांच्या संसद आणि मतदारसंघातील कामगिरीचे मूल्यमापन
नवी दिल्ली: प्रतिनिधी
काँग्रेस पक्षाकडून आपल्या खासदारांच्या संसदेतील आणि मतदारसंघातील कामगिरीचे मूल्यमापन केले जाणार आहे. त्यासाठी पक्षाने विशेष यंत्रणा तयार केली आहे. अधिक चांगले काम करणाऱ्या खासदारांना पक्षाकडून अधिक संधी दिली जाणार आहे. खासदारांना आपल्या मतदारसंघातील जनतेत मिसळण्याचे आणि त्यांच्या. प्रश्नांना सभागृहात वाचा फोडण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
या लोकसभेतील काँग्रेसचे बहुसंख्य खासदार प्रथमच निवडून आले आहेत. त्यांना संसदेतील कामकाजाचे प्रशिक्षण मिळावे, चांगले काम करणाऱ्या तरुण खासदारांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने काँग्रेसच्या वतीने ही पावले उचलण्यात येत आहेत. काँग्रेस खासदारांसाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत याबाबत माहिती देण्यात आली.
काँग्रेसकडून आपल्या अधिकाधिक खासदारांना सभागृहात बोलण्याची संधी दिली जात आहे. उद्धाटन सत्रापासून आतापर्यंत पक्षाच्या तब्बल ८० खासदारांना बोलण्याची संधी देण्यात आली आहे. सदस्यांनी जनतेचे प्रश्न सदनात प्रभावीपणे मांडावे. त्या प्रयत्नात आपल्याकडून चुका झाल्या तरी त्याबाबत भीती बाळगू नये, असेही त्यांना सांगण्यात आले आहे.
खासदारांनी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मांडावेत. ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या त्या ठिकाणी सरकारच्या चुका प्रभावीपणे दाखवून द्याव्यात. त्यांच्या ध्येयधोरणांवर आक्रमकपणे टीका करावी. संसदीय कामकाजात अधिकाधिक भाग घ्यावा. मतदारसंघातील जनतेला पुरेसा वेळ उपलब्ध करून द्यावा, अशा सूचनाही काँग्रेस खासदारांना करण्यात आल्या आहेत.
