सत्कृत्याने आपण भगवंताला ही प्राप्त करू शकतो – ह.भ. प. पांडुरंग महाराज घुले
पुणे : प्राप्त आयुष्यात वाईट काम करू नका. सत्कृत्याने आपण भगवंताला ही प्राप्त करू शकतो. देवाला खेचून आणण्याची ताकद आपण केलेल्या पुण्य कार्यात आहे. भूतकाळातील कृत्यांचा विचार करू नका पुढील आयुष्यात चांगले कृत्य करून पुण्य कमवा, असे प्रतिपादन ह.भ.प. पांडुरंग महाराज घुले (गाथा मंदिर देहू) यांनी केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त आयोजित कीर्तन महोत्सवात ते बोलत होते. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
ह.भ. प. पांडुरंग महाराज घुले, प्रत्येक क्षणाची कृती ही पुण्य असावी. पुण्याचे संचित असेल तर अशक्य ही शक्य होईल. ही पुण्य कार्याची ताकद आहे. चांगली कृती केली तरच पुण्य मिळते. दुष्कृत्यामुळे जीवनात पाप तयार होते. पाप कधीही चांगले घडू देत नाही तर पुण्य कधीही वाईट घडू देत नाही.
तुकाराम महाराजांच्या अभंगाबद्दल बोलताना ते म्हणाले, अभंग हे तारक आहेत. अभंगाप्रमाणे आपले जीवन बनवण्याचा प्रयत्न करावा. अभंग हे भगवंताच्या कृपेतून, संतांच्या कृपेतून निर्माण झालेले आहेत. या अक्षरांमध्ये मोठी ताकद आहे. अभंग नजरेसमोर ठेवून आपल्या जीवनाची वाटचाल करा. अभंग आपल्याला नक्कीच तारणारे आहेत.
