मुंबईतील 36 पैकी तब्बल 15 जागांवर काँग्रेस दावा करणार
मुंबई: प्रतिनिधी
शिवसेनेचे वर्चस्व असणाऱ्या मुंबईतील 36 पैकी तब्बल 15 जागांवर काँग्रेस दावा करणार आहे. त्यापैकी काही जागांवर शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत. या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत जागावाटपादरम्यान बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केल्यानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला आहे. मुंबईतील सर्व 36 विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने निरीक्षक नियुक्त केले आहेत. हे निरीक्षक प्रत्येक मतदारसंघाला भेट देऊन त्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा अधिक प्रभाव आहे, कोणत्या संभाव्य उमेदवाराला मतदारांकडून अधिक पसंती दिली जाऊ शकते, यासंबंधीचा सविस्तर अहवाल पक्षश्रेष्ठींना सादर करणार आहे. वरिष्ठ नेते या अहवालांचे विश्लेषण करून जागा वाटपात कोणत्या जागांवर दावा करायचा याचा निर्णय घेणार आहेत.
शिवसेना हा महाराष्ट्रापुरता मर्यादित प्रादेशिक पक्ष आहे. मुंबई हा शिवसेनेचा प्राण आहे. मुंबईत शिवसेनेचे प्राबल्य कमी झाल्यास त्या पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. त्यामुळे मुंबईतील आपला प्रभाव कायम ठेवण्यासाठी शिवसेनेचा आटकाट प्रयत्न राहतो. या पार्श्वभूमीवर मुंबईतील जवळजवळ निम्म्या विधानसभा मतदारसंघांवर, त्यातही शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे असलेल्या मतदारसंघांवर काँग्रेस दावा करणार असेल तर या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. मलबार हिल, भायखळा, अनुशक्ती नगर, वडाळा, चांदीवली अशा एकूण 15 मतदारसंघांवर दावा करण्याचा काँग्रेसचा मानस आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबईत फारसा प्रभाव नसल्याने त्यांना काँग्रेसच्या या भूमिकेमुळे कोणताही फरक पडणार नाही. मात्र, मुंबईवर अस्तित्व अवलंबून असलेला शिवसेना उद्धव ठाकरे गट काँग्रेसच्या मागणीवर आगपाखड केल्याशिवाय राहणार नाही.
