शेकाप महविकास आघाडी सोबतच – जयंत पाटील
मुंबई: नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील पराभूत झाले. आपल्या अपयशाचे खापर त्यांनी काँग्रेसवर फोडले आहे. काँग्रेसने आपल्या मतांची समान वाटणी करण्याऐवजी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला प्राधान्य दिल्याने आपला पराभव झाल्याचा ठपका पाटील यांनी ठेवला आहे. या निवडणूक निकालानंतरही आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याबरोबर आहोत आणि यापुढेही त्यांच्याबरोबरच राहू, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.
नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले. काँग्रेसचे दोन तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा एक उमेदवार निवडून आला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आपला उमेदवार न देता महाविकास आघाडीत घटक पक्ष असलेल्या शेकाफोला पाठिंबा दिला. मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आणि शेकापोची मते कुठली. त्यामुळे जयंत पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
जयंत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बारा मते आणि त्यांचे स्वतःचे एक अशी प्रथम प्राधान्यक्रमाची मते अपेक्षित होती. मात्र, शरद पवार गटाचे एक मत फुटले. तरीही दुसऱ्या प्राधान्यक्रमाची 25 ते 30 मते घेऊन आपण निवडून येऊ असा विश्वास पाटील यांना होता. मात्र, काँग्रेसने द्वितीय प्राधान्यक्रमाची मते आपल्याकडे न वळवता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांच्याकडे अतिरिक्त मते टाकल्यामुळे आपला पराभव झाला, असे जयंत पाटील यांनी नमूद केले आहे.
महाराष्ट्रात राजकारण पूर्वीसारखे राहिलेले नाही. त्याला गालबोट लागले आहे, अशी खंत देखील पाटील यांनी व्यक्त केली. आपण विजयी झालो तरी आणि पराभूत झालो तरीही आत्मचिंतन करीत असतो. या पराभवाची ही कारणमीमांसा करण्यात येईल, असे सांगतानाच पाटील यांनी या पुढील काळातही महाविकास आघाडी आणि शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
