महाराष्ट्रात परिवर्तनाची सुरुवात – शरद पवार
मुंबई : आज लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल जाहीर करण्यात येत आहे. संध्याकाळपर्यंत लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर येणार आहे. दरम्यान मतमोजणी सुरु असून १० पैकी ७ जागांवरती शरद पवार गट आघाडीवर आहे. दरम्यान, शरद पवार यांनी या निकालावर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात परिवर्तनाची सुरुवात झाली असल्याची प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली.
ते म्हणाले, “या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बरेच कष्ट घेतले. महाराष्ट्रात परिवर्तनाची सुरुवात झाली आहे. देशपातळीवरचं चित्रही आशादायक आहे. आज अनेक चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने मर्यादित १० जागा लढवल्या पण आम्ही जवळपास ७ जागांवर आघाडीवर आहोत. म्हणजे आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे,” अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
आजच्या निकालाने देशपातळीवर चित्र आशादायक आहे. यापूर्वी भाजपाला उत्तर प्रदेशात किंवा हिंदी भाषिक प्रदेशात जे यश मिळत होतं, ते खूप जास्त होतं, यंदा त्यांना म्हणावं तसं यश मिळालं नाही. त्यामुळे त्यांना यंदा मर्यादित जागा मिळाल्या आहेत. इंडिया आघाडीने हिंदी भाषिक प्रदेशात विशेष लक्ष दिलं, त्यामुळे आज उत्तरेकडचा निकाल बदलला आहे, असेही ते म्हणाले.
