पाण्यासाठी महायुतीचा उमेदवार खासदार म्हणून संसदेत पाठवण्याची आपली जबाबदारी – माजी आमदार सुजीतसिंह ठाकुर
धाराशिव : लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोमात सुरू आहे. धाराशिव लोकसभेसाठी येत्या 7 मे रोजी मतदान होणार आहे. दुष्काळ आपल्या पाचवीला पूजलेला आहे. त्यामुळे आपल्या भागात आपल्या हक्काच पाणी आणायच असेल तर केंद्रात आपल्या विचारांचे सरकार असणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या भागातून महायुतीचा उमेदवार खासदार म्हणून संसदेत पाठवण्याची आपली जबाबदारी आहे, असे आवाहन माजी आमदार सुजीतसिंह ठाकुर यांनी मतदारांना केले.
धाराशिव लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी कौडगाव ता.परंडा येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार सुज़ीतसिंह ठाकुर बोलत होते. यावेळी शिवसेनेचे युवानेते व माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत उपस्थित होते.
ठाकूर म्हणाले, जेव्हा मी पहिल्यांदा आमदार झालो तेंव्हा मी येथील दुष्काळ घालवण्याचा संकल्प केला होता. त्यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मी येथील दुष्काळावर एक पत्र लिहिले होते. त्यावर फडणवीस यांनी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पआची बैठक लावली. त्यात आमच्या पाणी आडवण्याच्या मर्यादा संपल्यात. पाणी साठा उपलब्ध नाही. असे सर्व मुद्दे मी मांडले. तेव्हा ‘मराठवाड्याचा पोपट मी मरू देणार नाही. पाण्यासाठी आवश्यक ती सगळी मदत करू’, असे आश्वासन त्यांनी दिले. सुदैवाने तेव्हा प्रकाश जावडेकर पर्यावरण मंत्री होते. त्यांनी तात्काळ बैठक बोलावून सिंचन योजनेवरील बंदी उठवली. त्यानंतर पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळवलं. आता आपल्याला 7 टीएमसी पाणी मिळत आहे. केंद्रात आणि राज्यात एकाच सरकार असले की निर्णय असे जलद गतीने होतात.
धनंजय सावंत म्हणाले, महायुतीचा उमेदवार जाहीर होण्यापूर्वी आम्ही उमेदवार बदलावा म्हणून खूप प्रयत्न केले पण वाटाघाटी करताना धाराशिवची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आणि माझी उमेदवारी कटली. पण महायुतीचा धर्म आम्ही पाळणार आहोत. मंत्री तानाजी सावंत यांनी शब्द दिल्या प्रमाणे आम्ही शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते महायुतीचा उमेदवार म्हणून अर्चना ताईंचा मोठ्या प्रमाणात प्रचार करणार आहोत, असा शब्द यावेळी दिला.
