मी शेतकऱ्याची मुलगी; शेतकऱ्यांची परिस्थिती त्यांची मानसिकता त्यांचे प्रश्न जाणून आहे – सुनेत्रा पवार
बारामती : राज्यात लोकसभा निवडणूकी मध्ये सध्या रंगत वाढत चालली आहे. राज्यात आज केंद्रीय गृहमंत्री अमिट शहा, कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सभा झाल्या, यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. बारामती लोकसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवलाय त्याला सार्थ करण्याचा शब्द गुरंजाई देवीच्या साक्षीने दिला.
यावेळी बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, ही निवडणूक महापालिकेची किंवा विधानसभेची निवडणूक नाही. तर ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. आपल्याला हा देश कोणाच्या हातात द्यायचा आहे? हे ठरवण्याची ही निवडणूक आहे.
विरोधकांकडून व इतरांकडून असा प्रचार होत आहे किंवा समज होत आहे की ही एका कुटुंबाची एका घरातली निवडणूक आहे मात्र असं नाही ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या मधील निवडणूक आहे. भारताच्या सक्षम नेतृत्वासाठी ही निवडणूक आहे. महायुतीतील आम्ही सर्व कार्यकर्ते व पक्ष या निवडणुकीत नरेंद्र मोदींसाठी उभे आहोत. सक्षम भारतासाठी विकासासाठी आणि उज्वल भविष्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत.
पुढे बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, आज एका कार्यकर्त्यांनी मला विचारले ताई तुम्ही लोकसभेत जा आणि आमच्यासारख्या सामान्य शेतकऱ्यांच्या समस्या संसदेत मांडा, पण मी त्यांना सांगू इच्छिते की, मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे, एका शेतकऱ्याची बायको आहे आणि लहानापासून मोठी होईपर्यंत मी शेतकऱ्यांची परिस्थिती त्यांची मानसिकता त्यांचे प्रश्न जाणून आहे. त्यामुळे दिल्लीत गेल्यानंतर मी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारच आहे, त्या विषयी तुम्ही निश्चिंत रहा.
दरम्यान, आपण विकासासाठी नरेंद्र मोदींसाठी उभी राहिले पाहिजे. गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदींनी राज्यातच नव्हे सबंध भारतामध्ये मोठ मोठी विकास कामे केली आहेत. आपला देश एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी आपल्याला बारामती लोकसभा मतदारसंघातील मोदींसाठी एक मत, एक उमेदवार पाठवायचा आहे. म्हणून महायुतीची एक उमेदवार म्हणून तुम्ही मला मोठा मताधिक्याने निवडून द्याल असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.
