भाजपा विरोधात मुलुंडकरांचा एल्गार, भाजपाच्या मतांवर होणार परिणाम
मुंबई – धारावीकरांचे पुर्नवसन करण्यासाठी मुलुंड पुर्व येथे मोठ्या प्रमाणावर बांधकामाला सुरवात झाली आहे. त्याला विरोध करण्यासाठी मुलुंडकर मोठ्या प्रमाणावर आंदोनल करीत असून या आंदोलनाचा सर्वाधिक फटका भाजपाला बसणार आहे. केंद्रात व राज्यात भाजपाची सरकार असूनही हा प्रकल्प मुलुंडकरांच्या माथी मारण्यात येत असल्याने या ठिकाणी भाजपाला जोरदार विरोधाचा सामना करावा लागत आहे.
मुलुंड पुर्व रेल्वे स्थानकाजवळ अँड. सागर देवरे यांच्यावतिने जोरदार आंदोलन करण्यात आले. मुलुंड मधील रहिवाश्यांनी हातात फलक घेऊन या आंदोलनात भाग घेतला. गेल्या काही दिवसांपासून मुलुंड मधील विविध ठिकाणी हे आंदोलन टप्प्याटप्याने करण्यात येत आहे. म्हाडा वसाहत, चिंतामणी गार्डन या ठिकाणी अशा प्रकारे आंदोलन करण्यात आले होते. त्यात हजारो मुलुंडकरांनी भाग घेतला होता.
मुलुंड पुर्व येथे महापालिकेच्यावतिने प्रकल्प ग्रस्तांसाठी सुमारे साडेसात हजार घरांची बांधणी करण्यात येत आहे. मुलुंड पुर्वची सध्याची लोकसंख्या एक लाख पस्तीस हजार इतकी आहे. त्यात प्रकल्पग्रस्त व धारावीकरांचे पुर्नवसन करण्यात येणार आहे. तसे झाले तर मुलुंड मध्ये लाखो लोकांचे पुर्नवसन केले जाईल. परिणामी वाहतुक व्यवस्था, पार्किंग व इतर पायाभूत सुविधांवर त्याचा परिणाम होईल.त्यामुळे मुलुंडचे माहुल होऊ देणार नाही. त्यामुळे या प्रकल्पाला जोरदार विरोध करण्यात येईल. असा इशार अँड. सागर देवरे यांनी दिला आहे. या प्रकल्पाविरोधात कायदेशीर लढाईला सुरवात झाली असून मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. अशी माहिती ही सागर देवरे यांनी दिली.
दरम्यान ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय दिना पाटील यांनी ही या प्रकल्पाला विरोध केला असून कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प या ठिकाणी होऊ देणार नाही. असे आश्वासन त्यांनी मुलुंडकरांना दिले आहे. मुलुंड मध्ये सहा नगरसेवक, आमदार, खासदार हा भाजपाचा असूनही हा प्रकल्प मुलुंड मध्ये जाणीवपुर्वक आणला गेला आहे. त्याला केंद्राने हिरवा कंदील दिल्याने स्थानिक पातळीवर कोणत्याही भाजपा नेत्याने विरोध केला नाही. केवळ अदानीला फायदा मिळावा म्हणुन हा प्रकल्प या ठिकाणी आणला जात असल्याचा आरोप सागर देवरे यांनी केला आहे.
