Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

भाजपने जनतेची फसवणुक केली – महाविका‌स आघाडीचा आरोप

पुणे : मागील दहा वर्षाच्या सत्ता काळात भाजप सरकारने इलेक्ट्रोल बॉन्ड, नोटबंदी या माधमातून मोठा भ्रष्टाचार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांनी मोठमोठ्या घोषणा केल्या मात्र त्या पूर्ण केल्या नाहीत. घोषणा करून जनतेला फसवणाऱ्या भाजपच्या पायाखालची वाळू आता घसरू लागली आहे, त्यामुळे पुणे लोकसभा मतदार संघाच्या बाहेरील उमेदवार एमआयएम व वंचितच्या माध्यमातून उभे करण्यात आले, असा आरोप महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांच्या शहराध्यक्षांनी केला.

महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी काँग्रेस भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख गजानन थरकुडे, माजी महापौर कमल व्यवहारे, माजी नगरसेवक रफीक शेख, अजित दरेकर उपस्थित होते.

अरविंद शिंदे म्हणाले, भाजपने इलेक्ट्रोल बॉन्ड आणि नोटबंदीच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार केला आहे. विरोधकांवर बोलणारे भाजप नेते या दोन विषयांवर शब्द काढत नाहीत. जे पंतप्रधान दहा वर्षात‌ पत्रकारांना उत्तर देवू शकले नाहीत, मग‌ ते जनतेला काय खरे बोलणार. दहा वर्ष जनतेला फसवणारे भाजप आज विकासाच्या नाही तर प्रभू श्रीरामाच्या नावाने मते मागत आहे. पुण्याचे उमेदवारही रामाचे नाव घेवून मते मागत आहेत. मात्र पुणेकर व देशातील सर्व मतदार या निवडणुकीत राम मंदिरावर नाही तर विकासावर मतदान करतील. भाजपच्या पायाखालची वाळू घसरत आहे. त्यामुळे भाजपने वंचित व एमआयएमला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. ते‌ कसे उभे‌ केले हे त्यांनात माहित. यांना पुणे मतदार‌संघात उमेदवार मिळाला नाही, म्हणून दोन्ही उमेदवार शिरुर मतदार संघातून आयात केले. या दोन पक्षाला मत म्हणजे भाजपला मत, हे दलित आणि मुस्लिम समाजाला कळून चुकले आहे‌. त्यामुळे या निवडणुकीत मतदान करताना पुणेकर महागाई, बेरोजगारी व शहरातील ढासळलेला कायदा‌ व सुव्यवस्थेचा डोळ्यासमोर ठेवून धंगेकर यांना निवडून देतील, अशा विश्वास‌ शिंदे यांनी व्यक्त केला.

प्रशांत जगताप म्हणाले, भाजपचे जे उमेदवार आहेत ते महापालिकेत स्थायी‌ समिती अध्यक्ष होते, महापौर होते. या काळात त्यांनी पुणेकरांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा वेगवेगळ्या टेंडरमध्येच लक्ष घातले. भाजपने समान पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून डोळ्यात धुळफेक‌ केली आहे. विविध योजनेच्या नावाखाली पुणेकरांना फसवण्याचे काम केले आहे. आता निवडणुकीच्या काळात महायुतीला शहरात मुळशी पॅटर्न आणायचा आहे, असेही‌ते म्हणाले.

गजानन थरकुडे म्हणाले, भाजपने कोथरुडमधून पालकमंत्री, खासदार दिले. कोथरूडला सत्ताकेंद्र केले. तरीही कोथरुडचा विकास झाला नाही. कोथरुडचा जो विकास‌ झाला तो माजी मंत्री शशिकांत सुतार यांच्याच काळात झाला. चंद्रकांत पाटील पालकमंत्री असताना काय कामे केली त्यातील केवळ चार कामे त्यांनी सांगावीत. विकासाचे गाजर दाखवून निवडणुक लढवली जात आहे. सुनेला पाठवा दिल्लीत लेकीला ठेवा गल्लीत अशी डॉ. निलम गोऱ्हे यांच्या टिकेचा समाचार घेताना थरकुडे म्हणाले, गोऱ्हे यांना स्वत:ला नगरसेवक म्हणून निवडून येता‌येत नाही, ना त्या एक नगरसेवक निवडून आणू शकत नाहीत. तरीही शिवसेनेने त्यांना गेल्या २० ते २२ वर्षे विधान परिषदेच्या आमदार केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading