‘ईश्वरपुरम्’ वसतिगृहातील विद्यार्थी उन्हाळी सुट्टीसाठी स्वगृही रवाना
पुणे : पुण्यातील ‘ईश्वरपुरम्’ वसतिगृहामध्ये राहून शिकणारी ईशान्य भारतातील मुले आपल्या उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हावरा, गुवाहाटीमार्गे आपल्या गावाकडे स्वगृही रवाना झाली.
नागालँड आणि अरुणाचल प्रदेश ही ठिकाण म्हणजे ईशान्य भारतातील निसर्ग सौंदर्याने नटलेला भूभाग. पण, शैक्षणिक आणि सामाजिक विकासाच्या दृष्टीने, या मुलांची मध्य भारताशी नाळ जोडली जावी, आपणही याच भारतमातेचे सुपूत्र आहोत ही भावना लहान वयापासून वृद्धींगत व्हावी, या उद्देशाने तरुण मुलांना पुण्यात आणले जाते. फुलगांव येथील लोकसेवा इंग्रजी माध्यम आणि नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत नागालँडमधील २० आणि अरुणाचल प्रदेशातील २० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
लहान वयातच पुण्यात आल्यामुळे ही मुल इथल्या वातावरणाशी लवकर एकरूप होतात. इथली भाषा, संस्कृती ते आत्मसात करतात. त्यामुळे ‘ईश्वरपुरम्’ वसतिगृह हे जणू त्यांचे दुसरे घरच झाले आहे. पण परीक्षा संपली की घरी जायचे वेध लागतात. नेहमीप्रमाणे यावर्षीही सर्व मुले हावरा, गुवाहाटी मार्गे आपल्या गावाकडे रवाना झाले आहेत. ‘ईश्वरपुरम्’ वसतिगृहाच्या प्रमुख शुभांगी मेहता या विद्यार्थ्यांना दिमापूर (नागालैंड) पर्यंत घेऊन जातात. सुट्टी संपवून जूनच्या दुसऱ्या आठवड्यात हे विद्यार्थी पुन्हा वसतिगृहात येतात. संस्थेचे अध्यक्ष विनीत कुबेर यांना या सर्व विद्यार्थ्यांना निरोप दिला.
