बाबासाहेबांचे विचारच देशाला तारतील : सुनील माने
पुणे : गेल्या दहा वर्षात देशात अराजकता माजली असून, संविधानाची अंमलबजावणी केली नसल्याने एस.एसी.,एसटी, ओबीसी यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. असे मत ज्येष्ठ पत्रकार तसेच कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांनी व्यक्त केले. येरवडा येथील राम सोसायटी पंचशील सेवा संघ येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी, राम सहकारी गृहरचना संस्थेचे अध्यक्ष योगेश लांडगे, पंचशील संघाचे अध्यक्ष मोहनराव ननावरे यांच्यासह शशीभूषण कांबळे,सुनंदा माने, बाजीराव मुळक,सुनंदा जोशी, मधुकर गायकवाड , शशिकांत बाराथे, निखिल गायकवाड, अनिरुद्ध हळंदे,यांच्यासह सोसायटीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदी उपस्थित होते.
सुनील माने म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची राज्यघटना तयार करताना सातत्याने पीडित शोषित समाज मुख्य प्रवाहात कसा येईल यासाठी घटनात्मक तरतुदी निर्माण केल्या. घटनेचा योग्य वापर न झाल्यास देशाची सामाजिक आणि आर्थिक चौकट उध्वस्थ होईल असा इशारा बाबासाहेबांनी संविधान सभेत दिला होता. दुर्देवाने बाबासाहेबांचे ते शब्द आज खरे ठरतात की काय अशी भीती वाटू लागली आहे. गेल्या दहा वर्षात राज्यघटनेची पायमल्ली होताना आपल्याला दिसत आहे. बाबासाहेबांचे विचार आधुनिक आणि समाजाला पुढे नेणारे होते. बाबासाहेबांनी महिलांना समान दर्जाची वागणूक मिळावी यासाठी प्रयत्न केला. महिलांना मतदानाचा अधिकार मिळवून दिला. महिला सबलीकरण तसेच मागासवर्गीयांसाठी नोकरी आणि शिक्षणामध्ये राखीव जागांची तरदूत केली. मात्र गेल्या १० वर्षात देशात सत्तेत असणाऱ्या केंद्र सरकारने हे आरक्षण संपवले. मागास, इतर मागास, आदिवासी, अल्पसंख्याक अधिकाऱ्यांनी उच्च पदांवर पोहोचू नये यासाठी बायलॅटरल एंट्री म्हणजे मागच्या दाराने सचिव भरून घेतले जात आहेत. मागासवर्गीय समाजातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सरू केलेली आरटीई प्रवेश पद्धती शासनाने बंद केली. केंद्र सरकारने मागास समाजाची साडेपाच लाख कोटींची तर राज्यसरकारने चाळीस हजार कोटींची घटनात्मक तरतूद नाकारून मागास व भटक्या विमुक्त समाजाची घोर फसवणूक केली आहे, असे त्यांनी सांगितले.
संविधानाच्या तरतुदींची अंमलबजावणीच केली नाही किंवा त्या दाखवण्यापुरत्या अंमलात आणल्या तर लोकशाहीची मूलतत्त्वे धोक्यात येतात. त्याच पद्धतीने देशातील लोकशाहीचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. एक पक्षीय आणि केवळ आम्ही सांगू तोच नियम या पद्धतीने सरकार चालले की तो देश अस्ताकडे मार्गक्रमण करतो. भारताची अवस्था त्या दिशेने सुरू आहे आणि ही गंभीर बाब आहे, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
यामुळे त्यामुळे आज बाबासाहेबांच्या प्रगत विचारांची देशाला आवश्यकता आहे असे म्हणता येईल. किंबहुना बाबासाहेबांचे विचारच देशाला तारू शकतील अस मत त्यांनी व्यक्त केले.
