विशेष लेख : डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘भारतीय स्वातंत्र्याचे सुराज्य’ करणारे संविधानकार..!
आज देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत आहे. त्यांनी स्वीकारलेला बौद्ध धर्म, त्यांची शिकवणुक, संदेश व मानवी मुल्यांचे सोपस्कार विषयी भावपूर्ण सुमनांजली व आदरांजली अर्पित करत आहोत.
हे करत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे स्वरूप काही ठिकाणी बदलत चालले आहे यांचे भान ठेवणे देखील गरजेचं आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ‘एका विशिष्ट पंथ, धर्म वा समाजापुरते’ मर्यादीत होते; असे मानून संकूचीत विचारांनी त्यांना मर्यादीत ठेवता कामा नये असे प्रकर्षांने वाटते व जाणवते आहे.
वास्तविक भारतीय स्वातंत्र्याचे प्रजासत्ताक भारतात रुपांतर करून देशात सुराज्य’ निर्माण करणारे संविधानकार
सर्वधर्मीय भारतीय नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी करणे हीच खरी काळाची गरज आहे. त्यासाठी त्यांच्या विचारांचे संदेश ठीकठिकाणी मोठ्या पोस्टरवर लावून, सध्याच्या काळात ते जनतेला पुन्हा अवगत करून देणे ही आजची देशाची, लोकशाही व संविघानाची गरज आहे.

आज त्यांचे जयंती निमित्त मात्र तरूणाई मोठ्या प्रमाणात डीजे साऊंड सिस्टीम वर गाणी लावून जयंती साजरी करण्याचे समाधान मिळवत आहे.. हे सर्वार्थाने अनुकरणीय व डॅा बाबासाहेबांच्या विचारांना धरून समर्थनीय आहे, असे माझ्या सारख्या राष्ट्रीय पक्षाच्या डॉ. बाबासाहेब प्रेमी कार्यकर्त्यास वाटत नाही. ऐवजी, त्याच स्पीकर्स चा ऊपयोग करून, संविधान, भारतीय घटना व लोकशाही मुल्ये पायदळी तुडवण्यापर्यंत मजल जाणाऱ्या सत्तांध मुक्या – बहीऱ्या सत्ताधार्यांच्या कानात शिरण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची व्याख्याने, संदेश, त्यांची संसदेतील भाषणे, व्याख्याने यांच्या कॅसेट्स आपण त्यांच्या जयंती निमित्ताने जर लावल्या तर ते अधिक फलदायी, प्रबोधनकारक व सत्ताधिशांची झोप ऊडवण्याचा प्रयत्न होईल, असेच मला वाटते. बाबाहेबांच्या जयंतीला स्पीकर लावून नाच – गाणे करण्यापेक्षा त्यांच्या शिकवणुकीचे संदेश पुन्हा दुर्बल, पिडीत व अन्यायग्रस्तांच्याही कानात जातील व डॅा बाबा साहेबांना अपेक्षीत संविधानिक लोकशाही व्यवस्थेत महात्मा गांधींच्या जनकल्याणकारी राज्याची संकल्पना, समता व समानतेचे अस्तित्व अबाधित रहाण्यासाठीच.. “शिका, संधटीत व्हा व संघर्ष करा” या त्याच्या संदेशाचे पालन केल्याचे सार्थ समाधान ही लाभेल..!

बाबसाहेबांची मतं, त्यांची धोरणे याविषयी कृतार्थ भावनेने जनजागृती झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्दिष्टे व संविधानापासून देशातील सत्ताधारी फारकत घेत असल्याचे पदेपदी दिसत असतांना.. महामानवाच्सा जयंती निमित्ताने त्याची जाणीव देखील जाहीररीत्या करून दिली पाहिजे हीच खरी त्यांना श्रध्दांजली ठरेल..!
त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने डॅा बाबासाहेबांच्या हातून घडलेले व प्रजासत्ताक भारवासीयांना स्वअर्पित केलेले संविधान आत्मसात करण्याची पुन्हा – पुन्हा आपण शपथ देखील घेतली पाहिजे हीच खरी आजच्या राजकीय परिस्थितीची गरज आहे असे ही सांगावेसे वाटते.
हे सर्व जर केले तरच त्यांच्या शिकवणुकीचा, त्यांच्या संदेशाचा या देशातील जनतेने अंगीकार करून त्यांचे प्रती खऱ्या अर्थाने आपण कृतज्ञतापूर्वक त्यांना श्रद्धांजली अर्पण करू शकू.
ज्या प्रमाणे शिव छत्रपतींच्या जन्मदिनी ठिकठिकाणी शाहीरांचे पोवाडे लागतात, शिवछत्रपतींची शिकवणूक, संदेश देणारी शाहीरी ऐकवली जाते त्या प्रमाणे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात असताना बाबासाहेबांच्या संविधानाची जाण, त्यांची भाषणं, त्यांचे संदेश याचा अधिकाधिक प्रचार व प्रसार करावा असेही मला वाटते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारीत त्यांच्या संदेश, शिकवण आणि ‘मला समजलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ अशा निबंध स्पर्धा देखील विद्यार्थ्यांमध्ये आयोजित करणे, त्यांच्या संघर्षशील जीवनावर आधारीत चित्रकला स्पर्धा त्यातील प्रसंग असे अतिशय आगळे वेगळे प्रबोधनपर कार्यक्रम घेवून महामानव डॅा बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जावी.
विद्यार्थ्यांच्या स्पर्धा त्यांच्या जीवन चरित्रातील प्रसंगांवर रंगवली – चित्रकला स्पर्धा इ घेण्यात याव्यात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे देशाप्रती समर्पित नेतृत्व व क्रांतीकारक व्यक्तिमत्व आहे, याची जाण प्रत्येक भारतीयांच्या मनात सतत राहावी हीच मनोकामना..व स्मृतीस ‘विनम्र अभिवादन’. जय हिंद, जय महराष्ट्र जयभीम..! धन्यवाद…!

- गोपाळ शंकरराव तिवारी, राज्य प्रवक्ता – महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमिटी
