Thursday, June 18, 2026
Latest NewsMAHARASHTRA

‘माझा देश माझी लोकशाही,चल गं… करु मतदान लावू बोटाला शाई!’ – उखाण्याद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितली मतदानाची महती

छत्रपती संभाजीनगर :- ‘माझा देश माझी लोकशाही, चल गं…. करु मतदान लावू बोटाला शाई’, या उखाण्यातून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी समोर असलेल्या श्रोतृवर्गाला मतदानाची महती सांगितली. स्वीप उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत वैजापूर येथे आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मतदान जनजागृतीच्या घोषणांनी आज वैजापूर नगरी दुमदुमली.

            वैजापूर  येथे आज मतदार जनजागृतीचे विविध उपक्रम राबविण्यात आले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी या कार्यक्रमांना हजर होते. उपविभागीय पोलीस अधिकारी महक स्वामी, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी  डॉ. अरुण जऱ्हाड, तहसिलदार सुनिल सावंत तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

सकाळी आठ वाजेपासून शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले. त्यात सर्व शासकीय अधिकारी- कर्मचारी,अंगणवाडी सेविका, शालेय विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.रॅलीत लेझीम पथकाचाही समावेश होता. मतदार जनजागृतीच्या घोषणा देऊन शहर दणाणून गेले. डीएड कॉलेजच्या प्रांगणामध्ये रॅलीचा समारोप झाला तेथे  विविध कार्यक्रमांनी मतदार जनजागृतीचा संदेश देण्यात आला. दीपक त्रिभुवन अव्वल कारकून यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. श्री स्वामी समर्थ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. शाहीर अशोक बागुल व त्यांच्या संचाने अतिशय सुंदर पोवाडा सादर करत मतदानाची महती सांगितली.

मतदार जागृती संदेश देणाऱ्या उखाण्यांच्या कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमात स्वतः जिल्हाधिकारी स्वामी यांनी स्वतः उखाणा सादर केला. त्यांनी घेतलेल्या ‘माझा देश माझी लोकशाही चल गं… करु मतदान लावू बोटाला शाई’ या उखाण्याला उपस्थितांनी दाद दिली. याप्रसंगी श्रीमती राजश्री बंड, सुवर्णा बोर्डे, दीपक त्रिभुवन, सुचिता हरेगावकर, उर्मिला जेजुरकर,सुरेखा पोटे, कमल खरे, नाजुका गायकवाड, केशव सूर्यवंशी आदींनी उखाणे सादर केले. तलाठी श्रीमीहिंगे यांनी एकपात्री  प्रयोग सादर करून लोकशाहीची भावना व्यक्त केली.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, मतदानाप्रति कर्तव्य भावना जागरुक व्हायला हवी. आपल्या देशाची लोकशाही बळकट करायची तर मतदानाचे प्रमाण वाढले पाहिजे. त्यासाठी लोकांना मतदान केंद्रांवर विविध सुविधांची उपलब्धता करुन दिली जाणार आहे. त्यात पाणी, सावली, लहान बालकांसाठी पाळणाघर, दिवंग्यासाठी व्हील चेअर, मेडिकल किटइ. विविध सुविधांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. कुणीही मतदानापासून वंचित राहू नये हे आयोगाचे ध्येय्य आहे. तथापि, सगळ्यांना मतदान करता यावे यासाठी मतदार सहायता केंद्रही स्थपन करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी स्वामी यांनी वैजापूर विधानसभा मतदारसंघ निहाय निवडणूक तयारीचा आढावाही घेतला. यावेळी सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading