“..म्हणून आढळरावांना मतदारसंघात जनतेचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय,” अतुल बेनकेंनी सांगितली खरी हकीकत
शिरूर : शिरूर लोकसभेचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे गेल्या पाच वर्षात मतदारसंघात फिरकलेच नसल्याने ठिकठिकाणी त्यांच्याविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अलिकडेच शिरोली फाट्याजवळ खासदार अमोल कोल्हे यांच्याविरोधात पोस्टर लावत गावकऱ्यांनी काही प्रश्नांची सरबत्ती केली होती. तर दुसऱ्या बाजूला माजी खासदार आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील मागच्या निवडणुकीत पराभव होऊनही जोमाने काम करतांना दिसत आहे.
आढळरावांना विजयी करण्यासाठी महायुतीच्या सर्व नेत्यांनी जोरदार सुरूवात केलीय. राष्ट्रवादी अजित दादा गटाचे आमदार अतुल बेनके देखील दररोज गावकऱ्यांच्या गाठीभेटी घेतांना दिसत आहेत. यातच त्यांनी कोल्हे यांच्यावर टिका करत आढळरावांचं कौतुक केलं आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे गेल्या पाच वर्षांत कोरोना काळ वगळता मतदारसंघामध्ये फिरकलेच नाहीत, याउलट शिवाजीराव आढळराव कोरोना काळ आणि त्यानंतर देखील पायाला भिंगरी बांधल्यागत संपूर्ण मतदारसंघामध्ये जनतेची कामे मार्गी लावण्यासाठी फिरत राहिले आणि म्हणूनच आज शिवाजीराव आढळराव यांना शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जनतेचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय, असे प्रतिपादन जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी केले.
दरम्यान, आढळरावांचा प्रचार करतांना अतुल बेनके यांना आलेला एक अनुभव त्यांनी कथन केला आहे. ते म्हणाले की, अजितदादा पवार यांचे आणि त्यांच्या कार्यपद्धतीचे अनेक चाहते राज्यभर भेटतात. शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जनसंवाद दौऱ्यादरम्यान असेच अजितदादांवर प्रेम करणारे एक व्यक्तिमत्त्व भेटले.
बोरी बु. गावचे बाळासाहेब जाधव यांची आज भेट झाली, त्यांनी अजितदादांचे अनेक अनुभव सांगत त्यांच्या विकासाच्या कार्य पद्धतीचे कौतुक केले. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबद्दल अतोनात आदर आहेच. परंतु भविष्यात महाराष्ट्र राज्याला गतीने पुढे नेण्याची क्षमता फक्त अजितदादांमध्ये आहे तेच सक्षमपणे नेतृत्व करू शकतात असे जनसामान्यांचे मत आहे असेही त्यांनी आवर्जून सांगितले. जाधव यांनी यावेळी माननीय अजितदादांशी केलेले जुने पत्र व्यवहार, फोटोंच्या स्वरूपातील आठवणींना उजाळा दिला तसेच जाधव यांनी जुन्नर तालुक्याच्या विकासकामांबद्दल समाधान व्यक्त केल्याचंही बेनके यांनी सांगितलं.
