Loksabha Election : उमेदवारीचं काही दडपण आहे का ? या प्रश्नावर सुनेत्रा पवार म्हणाल्या..
पुणे : राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभेची निवडणुक होत आहेत. यातच देशातील सर्वात चर्चेत आलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांचा सामना होणार आहे. यानिवडणुकीवरून अजितदादांना त्यांचं नेतृत्व सिद्ध करण्याची तर सुप्रिया सुळे यांना स्वत: अस्तित्व टिकवून ठेवण्याची वेळ आल्याचे दिसून येत आहे. अशातच दोन्ही उमेदवारांनी आपल्या प्रचाराला जोरदार सुरूवात केली आहे. यावरूनच सुनेत्रा पवार यांनी निवडणुकीबाबत मोठं भाष्य केलं आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत एका बाजुला शरद पवारांसारखे ज्येष्ठ राजकारणी नेते आहेत. दुसऱ्या बाजूला अजितदादांसारखे नवे नेतृत्व आहे. या निवडणुकीत तुम्हाला काही उमेदवारीचं दडपण आहे का ? असा सवाल सुनेत्रा पवार यांना करण्यात आला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, सुरूवातीपासूनच ही राजकीय लढाई असल्याची आम्ही भूमिका घेतली आहे. त्यामुळे या निवडणुकीत नात्याचं राजकारण आणणं एक प्रकारे चुकीचं आहे. लोकसभा निवडणुक ही फार मोठी आहे. त्यामुळे राजकारण राजकारणाच्या जवळ तर नातं हे नात्याच्या जवळ ठेवलं तर चांगलं होईल. असे उत्तर सुनेत्रा पवार यांनी दिलंय.
अजितदादांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपसोबत जात आपलं राजकारण मर्यादित केलं असल्याचं तुम्हाला वाटतं आहे का ? त्यावर त्या म्हणाल्या की, मला असं वाटत नाही की असं काही आहे. परंतु अजितदादा ज्यावेळी एखादी भूमिका घेतात. त्यावेळी ते पुर्ण विचारकरूनच भूमिका घेतात. त्यामुळे अजितदादांच्या विचारांसोबत आम्ही सर्व जण सोबत आहे.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांचा सामना विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत होणार आहे. सुप्रिया सुळे यांना पुन्हा विजयीकरण्यासाठी शरद पवार स्वत: मैदानात उतरले आहेत. तर दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजितदादांसह भाजप शिंदेंची शिवसेना चांगलीच कामाला लागली आहे. त्यामुळे येत्या ०४ जुनला कोणाच्या बाजूने निकाल लागणार ? याची प्रतिक्षा आता सगळ्यांना लागून राहिली आहे.
