शेतक-यांच्या आत्महत्या हीच मोदींची गॅरंटी का? शरद पवारांचा हल्लाबोल
पुणे : ‘आज हे सांगतात, शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट वाढवतो. गेली दहा वर्षे मोदी सत्तेत आहेत, उत्पन्न वाढले का? उलट शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्या. शेतक-यांवर आत्महत्या करण्याची वेळ आणली, हीच मोदींनी गॅरंटी दिली’’ अशी खोचक टीका शरद पवार यांनी केली. लोणावळ्यात शरद पवारांनी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात बोलताना शरद पवारांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ‘भाजप म्हणजे वॉशिंग मशिन, आरोप करा आणि पक्षात प्रवेश देऊन धुऊन काढा, भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. त्यासोबतच विविध मुद्यांवर त्यांनी भाष्य केले आहे.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, आदर्श सोसायटी घोटाळ्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा हात आहे, असा आरोप भाजपने केला. सातव्या दिवशी ते भाजपमध्ये गेले आणि पंधराव्या दिवशी ते भाजपचे खासदार झाले. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे भ्रष्टवादी पक्ष म्हणाले. राज्य सहकारी बँक आणि जलसंपदा विभागात घोटाळा केला, असा आरोप मोदींनी केल्यावर मी म्हणालो, हिंमत असेल, तर चौकशी करा. दूध का दूध आणि पानी का पानी होऊ दे, मोदींनी चौकशी करावी. मात्र घडले काय? ज्यांच्यावर आरोप केले आज ते भाजपमध्ये आहेत.
त्यामुळे भाजप म्हणजे वॉशिंग मशिन झालेली आहे. आरोप करा आणि त्यांना पक्ष प्रवेश देऊन आरोप धुऊन काढा’’ अशी टीका शरद पवार यांनी केली. ‘‘सत्तेचा गैरवापर भाजप करतोय. झारखंड, दिल्ली या राज्यात तेच घडतं. नोटीस, समन्स द्यायचे आणि तुरुंगात टाकायचे. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही लवकरच अटक केली जाईल’’असे शरद पवार म्हणाले.
‘पक्ष स्थापनेपासून आम्ही विचारधारा कधीच बदलली नाही. जवाहरलाल नेहरूंबद्दल काहीही बोलले जाते आहे. गांधी, सुभाषबाबू, जवाहरलाल नेहरू यांचे योगदान हे देश स्वतंत्र करण्यासाठी होते. आज देशाचे पंतप्रधान प्रत्येक दिवशी पूर्ण पान जाहिरात देतायेत. त्यात मोदींची गॅरंटी देतायेत, पण ही कोणाच्या पैशाने जाहिरात दिली जातेय. जनतेच्या पैशाने हे गॅरंटी देतायेत’ अशी टीका शरद पवार यांनी केली.
शरद पवारांनी भाजपवर निशाणा साधत म्हटलं आहे की, लोकशाहीला संकटात नेहणारा कारभार मोदींकडून सुरू आहे. सामान्य माणसांचे अधिकार उध्वस्त होतील. त्यामुळं लोकशाही आणि घटनेचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे. तुम्ही सर्वांना यात सहभागी व्हायला हवं. सत्तेचा गैरवापर भाजप करतं आहे. झारखंड, दिल्ली या राज्यात तेच घडतंय. नोटीस, समन्स द्यायचे आणि तुरुंगात टाकायचे. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरंिवद केजरीवाल यांना ही लवकरच अटक केली जाईल, असंही पवारांनी म्हटलं आहे.
