पुण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी नेटाने प्रयत्न करणार – सुनील देवधर
पुणे : हाती घ्याल ते तडीस न्या ही नूमविची शिकवण असून, तशीच शिकवण मलाही मिळाली आहे. सद्य:स्थितीत पुण्याच्या विकासाबाबत नियोजना पातळीवर गोंधळाची स्थिती जावणते. येणाऱ्या काळात पुण्याच्या स्थानिक प्रश्नांचे योग्य व सर्वंकष निराकरण होईल, यासाठी सर्वार्थाने प्रयत्न करणार असल्याचा विश्वास भाजपचे नेते सुनील देवधर यांनी व्यक्त केला .
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात ‘एका पेक्षा एक नूमविय’ या रंगतदार मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. नूमविचे माजी विद्यार्थी असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते सुनील देवधर यांची प्रकट मुलाखत, शाळेचे दुसरे माजी विद्यार्थी सुप्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी घेतलेली ही मुलाखत असे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते.
पुण्यात जन्मलो, इथेच नूमवित शिकलो, महाविद्यालयीन शिक्षणानंतर एवढे दिवस देशभरात विविध ठिकाणी काम केले असून, आता पुण्यात राहून काम करणार आहे. मागील काही वर्षांत पुण्याचे अनेक प्रश्न सुटू शकलेले नाहीत. स्व. गिरीश बापट हे एक उत्तम लोकप्रतिनिधी होते, परंतु त्यांच्या आजारपणामुळे काही गोष्टी करणे शक्य झाल्या नाहीत. त्यामुळे मागील काही वर्षांपासून प्रलंबित राहिलेले पुण्याचे अनेक प्रश्न आहेत. काही स्थानिक आहेत, काही राज्य पातळीवरील तर काही देश पातळीवरील प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवण्याचा मी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आहे. कारण, मला पुण्येश्वराने पुण्यात बोलावले असून, पुण्याच्या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे, सुनील देवधर यावेळी म्हणाले.
तुमच्या काही गंभीर समस्या असतील तर त्या पीएमओला लिहा, त्या सुटतीलच याची खात्री आहे. कारण ते नरेंद्र मोदी आहेत. प्रत्येकाच्या प्रश्नाला न्याय देण्याचे काम मागील १० वर्षांत त्यांच्या सरकारने केले असून नरेंद्र मोदी बहुमताने पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान व्हावेत, याकरिता भारतीय जनता पक्ष विजयी झाला पाहिजे, यासाठी आम्ही सर्वजण समर्पित भावनेने काम करत आहोत. इथे पक्ष सांगेल तो आदेश मान्य आहे, अशी भूमिका देखील देवधर यांनी याप्रसंगी बोलताना मांडली.
मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी सुनील देवधर यांना, त्यांच्या आजवरच्या एकूण राजकीय आणि सामाजिक जीवनातील घडामोडींवर प्रश्न विचारले, ज्याची देवधर यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. देवधर यांचे पुण्यातील बालपण, नुमविय म्हणून आठवणी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्वोत्तर राज्यातील प्रचारक, माय होम इंडिया या संस्थेचे संस्थापक आणि आजवरचा राजकीय प्रवास या सर्व पैलूंना उलगडा यावेळी त्यांनी आपल्या संवादातून केला. यावेळी विविध अनुभवलेले किस्से देखील त्यांनी मांडले.
