अभिलेखांचे जतन करणे काळाची गरज – डॉ. भास्कर थाटावकर
पुणे, ०१: अभिलेखांचे जतन करणे काळाची गरज आहे. कारण जतन केलेल्या अभिलेखामुळे अनेक ऐतिहासिक वादाचा उलगडा होऊ शकतो, असे मत पुराभिलेख संचालनालयाचे माजी संचालक डॉ. भास्कर धाटावकर यांनी मांडले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात न. चिं. केळकर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते ‘राष्ट्रीय जीवनात ऐतिहासिक अभिलेखांचे महत्व’ याविषयावर बोलत होते. विद्यापीठाच्या इतिहास विभागातर्फे आयोजित या एकदिवसीय व्याख्यानमालेचे अध्यक्ष इतिहास विभागाचे निवृत्त विभागप्रमुख प्रा. दीपक गायकवाड होते. याप्रसंगी या कार्यक्रमाचे संयोजक डॉ. बाळासाहेब दुधभाते आणि विभागप्रमुख डॉ. श्रद्धा कुंभोजकर उपस्थित होत्या.
पुढे बोलताना, प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंतचे इतिहास लेखन करण्यासाठी जतन केलेल्या शिलालेख व अभिलेखांची मदत मोठ्या प्रमाणावर झाली आहे. या जतन केलेल्या अभिलेखामुळेच वस्तुनिष्ठ इतिहास पुढे आला. भविष्यातील इतिहास लेखनांसाठी आजचे अभिलेख आपण व्यवस्थित जतन करणे काळाची गरज असल्याचे डॉ. भास्कर धाटावकर म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बाळासाहेब दुधभाते यांनी केले. तर सुत्रसंचालन रेणुका कुलकर्णी आणि साक्षी जाधव आणि आभार प्रदर्शन डॉ. श्रद्धा कुंभोजकर यांनी केले.
