Tuesday, June 2, 2026
Latest NewsPUNE

यंदाचा ‘कलाश्री पुरस्कार’ उस्ताद मश्कुर अली खाँ यांना, तर ‘युवा पुरस्कार’ बासरी वादक दीपक भानुसे यांना प्रदान

पिंपरी : कलाश्री संगीत मंडळातर्फे देण्यात येणारा यंदाचा ‘कलाश्री पुरस्कार’ किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक उस्ताद मश्कुर अली खाँ यांना, तर प्रसिद्ध बासरी वादक दीपक भानुसे यांना युवा पुरस्काराने गौरविण्यात आले.

पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह येथे आयोजित कलाश्री संगीत महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी माजी महापौर माई ढोरे, कलाश्री संगीत मंडळाचे संस्थापक पं. सुधाकर चव्हाण, उद्योजक अविनाश सुर्वे, पं. रामराव  नाईक, डॉ. शीतल मोरे, तुकाराम भाऊ, जे. व्ही. इंगळे, अविनाश सुर्वे, सचिन ओव्हाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी महापौर माई ढोरे म्हणाल्या, की गेली २६ वर्षे कलाश्री संगीत महोत्सव सुरू राहणे, ही मोठी झेप आहे. अगदी सातासमुद्रापार मंडळ उपक्रमशील कार्यक्रम राबवत आहे, ही अभिमानास्पद गोष्ट आहे.

अविनाश सुर्वे म्हणाले, की होतकरू कलाकार घडविण्यासाठी मंडळ करीत असलेले काम महत्त्वपूर्ण आहे. बुद्धीची तीव्रता वाढविण्यासाठी संगीत महत्वाचे आहे.

सचिन ओव्हाळ म्हणाले, की संगीत ही सर्वात लोकप्रिय भाषा आहे. आम्ही कलाश्री अमेरिकेत घेऊन गेलोय. तिथेही हाऊसफुल बोर्ड लावावा लागला.

दीपक भानुसे म्हणाले, की गुरु, आईवडील यांच्या आशीर्वादामुळेच हा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार प्रोत्साहन ठरणार आहे.

उस्ताद मश्कुर अली खाँ यांनी पुरस्काराला उत्तर देताना सांगितले, की कलाश्री आम्हचा परिवार आहे. इथे येऊन छान वाटले. पुरस्काराने आणखी जबाबदारी वाढली आहे. कलाश्रीचे काम याच उममेदीने सुरू राहावे.

आयोजक पं. सुधाकर चव्हाण यांनी प्रास्ताविक, तर नामदेव तळपे यांनी सूत्रसंचालन केले.

कलाश्री संगीत महोत्सवाचा समारोप


कलाश्री संगीत महोत्सवात शेवटच्या दिवशी पंडित भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांनी राग अभोगीने गायनाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘आता कुठे धावे मन’ भजन गायले. याला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. त्यांना तबल्यावर पांडुरंग पवार यांनी, तर हार्मोनियमवर अविनाश दिघे यांनी साथसंगत केली. त्यानंतर किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक उस्ताद मशकुर अली खाँ यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांनी राग पुरिया गायला. त्यांना तबल्यावर भरत कामत यांनी, तर हार्मोनियमवर सुयोग कुंडलकर यांनी साथसंगत केली. अमरत्या चटर्जी घोष यांच्या कत्थक नृत्याने या महोत्सवाची सांगता झाली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading