Saturday, June 20, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

शिवसेना ज्यांच्यामुळे दिग्गजांनी सोडली, त्यांच्याच हातून पक्ष सुटला – शर्मिला ठाकरे

मुंबई : आदित्य ठाकरे यांची बाजू घेणा-या काकी अर्थात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या प्रतिक्रियेमुळे ठाकरे बंधूंमधील दुरावा कमी होत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र त्यानंतर काही दिवसांतच ही दरी पुन्हा वाढल्याचे दिसले. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्यानंतर शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आणि त्यांच्या मनातील खदखद पुन्हा समोर आली. मनसेच्या विक्रोळी महोत्सवात त्या बोलत होत्या.

एका वाक्यात सांगायचं तर आज एक सर्कल पूर्ण झालं आहे. आज म्हणण्यापेक्षा दहा तारखेला (दहा जानेवारी – राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेबाबत निकाल दिल्याचा दिवस). शिवसेनेतील ज्या दिग्गज नेत्यांना या माणसामुळे बाहेर जायला लागलं होतं, त्यांच्याच हातातून पक्ष सुटला, अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी दिली.

दुसरीकडे, उद्धव ठाकरे गटाने राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाचे विश्लेषण करण्यासाठी बोलावलेल्या ‘जनता न्यायालया’वर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ताशेरे ओढले आहेत. ‘ही कल्पना जगात भारी आहे. आपल्या मनासारखा निकाल लागला नाही, तर आपलं स्वत:चं न्यायालय स्थापन करून आपल्या आवडीचा निर्णय लावून घ्यायचा…लई भारी!!’ अशी पोस्ट देशपांडेंनी ‘एक्स’वर केली आहे.

याआधी, मी माझ्या पुतण्यावर विश्वास दाखवला, पण तुम्ही ज्या भावाबरोबर लहानाचे मोठे झालात, त्याच्यावर थोडा तरी विश्वास दाखवायला हवा होता, अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी दिली होती. शर्मिला ठाकरे यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणी स्थापन एसआयटी चौकशीवरून आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली होती. त्यावरून संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी शर्मिला ठाकरे यांचे आभार मानले होते. त्यावर शर्मिला यांनी डिसेंबर महिन्यात प्रतिक्रिया दिली होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading