विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांकडून न्यायालयाचा अवमान – उद्धव ठाकरे
मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्स नुसार निर्णय द्यायचा होता, मात्र नार्वेकरांनी न्यायालयाचा अवमान करीत न्यायालयाचे आदेश पायदळी तुडवले आहे. त्यांनी लोकशाहीची हत्या केली आहे. काल शिंदेंची भेट घेतली तेव्हाच नार्वेकरांनी मिलीभागत करत हा निकाल घेतला, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
ठाकरे म्हणाले, निवडणूक आयोगाच्या निकालाला ग्राह्य धरून नार्वेकरांनी निकाल दिला आहे. वास्तविक या निकालाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे नार्वेकरांच्या निकालाचा पायाच चुकीचा आहे. त्यांनी शिवसेना पक्षाची २०१८ ची घटना मान्य केलेली नाही तर आमच्या आमदारांना अपात्र का केलं नाही?, असा प्रश्न देखील ठाकरे यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, पक्षांतर रोखण्यासाठी एक चांगला निकाल देण्याची नार्वेकरांना संधी होती. मात्र नार्वेकरांनी पक्षांतराचा राजमार्ग कसा असावा हे दाखवून दिले आहे. नार्वेकरांना केवळ वेळ काढूपणा करायचा होता त्यामुळे त्यांनी निर्णय घेण्यासाठी इतके दिवस लावले, असे ही ठाकरे म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार
राहूल नार्वेकरांनी दिलेल्या निकालामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याचे उघड आहे. शिवाय आज दीलेल्या निकाला विरोधात आम्ही पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच अशा राजकीय निकालामुळे शिवसेना संपणार नाही, असे ही असे ही अधोरेखीत केले.
