‘डोळे आणि कानांचे अॅंटेना सज्ज ठेवून व्यक्त झालेल्या कथा’ – प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर
पुणे : विषयांचे वैविध्य, पात्रांचा मनोविश्लेषणात्मक विचार ही वैशिष्ट्ये घेऊन आणि डोळे व कानांचे अँटेना सज्ज ठेवत गिरवलेली मुळाक्षरे शोभा जोशी यांच्या कथासंग्रहातून भेटतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ औद्योगिक प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांनी केले. समाजशास्त्र, मानसशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि भाषेच्या अभ्यासक शोभा गोडबोले जोशी लिखित ‘मुळाक्षरे गिरवताना’ या कथासंग्रहाचे प्रकाशन पाकणीकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. लेखिका शोभा जोशी, यशवंत जोशी, संस्कृततज्ज्ञ डॉ. सुनीती आफळे, गायिका मंजुषा पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. ज्ञानगंगा प्रकाशनाच्या वतीने नुकताच विधी महाविद्यालय रस्त्यावरील कोलाज हॉटेल जवळील दामले सभागृह या ठिकाणी हा कथासंग्रह प्रकाशित कऱण्यात आला.
यावेळी बोलताना पाकणीकर म्हणाले, “मराठी साहित्यात कथालेखनाची दीर्घ परंपरा आहे. शोभा जोशी यांच्या कथालेखनामुळे या परंपरेत एका नव्या नावाची भर पडली आहे. लेखिकेची निरीक्षणशक्ती, अनुभवांची परिपक्वता, छोट्या घटना, प्रसंगातून टिपलेले व्यक्ती व स्थळविशेष तसेच विषयांची विविधता, हे या कथांचे वैशिष्ट्य आहे. लेखिकेची शैलीही सुगम व सहज आहे’.
मनोगत मांडताना शोभा जोशी म्हणाल्या, वाचनवेड, जे वाचले ते सांगण्याची ओढ, अनुभवांचे संचित, स्त्री म्हणून वावरताना जाणवलेली स्पंदने मला अंतर्मुख करत गेली आणि समाजमाध्यमांतून मी लेखनाला सुरवात केली. फेसबुक पेज तसेच ‘बिइंग इंडियन’ या माझ्या फेसबुक पेजवर मी व्यक्त होऊ लागले. त्याला वाचकांची दाद मिळू लागली आणि आज त्या लेखनाला हे पुस्तकरूप मिळाले. आयुष्याच्या या प्रवासात मी कान, डोळ्यांची आणि जाणिवांची दारे खुली ठेवली. माझ्या कथा त्यातूनच लेखनरूप घेत गेल्या आहेत’. जोशी यांनी त्यांच्या बाहुली, खलिश आदी कथांचे संदर्भ घेत आपला लेखनप्रवास उलगडला.
वाचकांचे प्रतिनिधित्व करताना राजेश भागवत म्हणाले, ‘शोभाताईंच्या कथा मानवी नातेसंबंधांवर नेमके भाष्य करतात. वेगवेगळे विषय त्या मांडतात. त्यांच्या सहज लेखनशैलीमुळे वाचक त्यांच्या लेखनाशी स्वतःला जोडून घेऊ शकतो. त्यांच्या कथांतील पात्रांचे स्वभाव, नाती, संघर्ष वेगळ्या सामाजिक जाणिवा मांडणारे आहेत. त्यांचे प्रवासवर्णनही वेगळेपणा जपाणरे आहे,’.
आदित्य जोशी, यशवंत जोशी यांनी परिचय करून दिला. सतीश फडके यांनी कथासंग्रहातील कथेचे सादरीकरण केले. हीना भागवत यांनी शोभा जोशी यांच्याशी संवाद साधला तर आकांक्षा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
