Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

विनोदवीर संतोष चोरडिया यांचे निधन

पुणे : ‘आम्ही एकपात्री’ या संस्थेच्या माध्यमातून एकपात्री कलाकारांची मोट बांधून त्यांच्या समस्या आणि गाऱ्हाणी सरकार दरबारी मांडणारे मृदू आणि प्रेमळ स्वभावाने जनमानसात लोकप्रिय असलेले एकपात्री कलाकार संतोष चोरडिया यांचे आज पहाटे हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी ४ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात भाऊ, मुलगा अजिंक्य, कन्या अपूर्वा असा परिवार आहे. चोरडिया यांनी त्यांच्या कलेच्या माध्यमातून सातत्याने एड्स ग्रस्त आणि कृष्ठरोग्यांमध्ये आनंद पेरण्याचे काम केले. कलेला समाजसेवेची जोड देत त्यांची वाटचाल सुरू होती. माध्यम प्रतिनिधींपासून राजकीय ,सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात ते सुपरिचित होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे . (Vinodveer Santosh Chordia passed away)


रंगभूमी , दूरचित्रवाणी आणि चित्रपट अश्या तिनही माध्यमात ते गेली ३८ वर्षे कार्यरत होते. झी टीव्ही वरील ‘हास्यसम्राट’ आणि सह्याद्री वाहिनीवरील ‘एम 2 जी 2’ या कार्यक्रमात वर्षा उसगावकर यांनी घेतलेल्या मुलाखतीद्वारे ते घराघरात पोहोचले.. ‘दुसरी गोष्ट’ , ‘कँपँचिनो ‘, ‘ दगडाबाईची चाळ ‘ , ‘प्रेमा ‘, ‘सरगम’ अशा अनेक मराठी गाजलेल्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. ‘जीना इसी का नाम है’ आणि ‘फुल २ धमाल’ या कार्यक्रमांची निर्मिती आणि सादरीकरण त्यांच्या चौफेर कलावृतीची साक्ष देणारे होते.
भारतासह परदेशात त्यांनी आपल्या कलाकर्तृत्वाचा झेंडा आपण रोवला. लंडन ,इस्राइल, ओमान येथील रसिकांना ‘हसवा हसवी’ या एकपात्री प्रयोगाने खळखळून हसविणारा विनोदवीर म्हणून ते सुपरिचीत होते.
त्यानी पंधरा हजारांहून अधिक वैविध्यपूर्ण रंगमंचीय कार्यक्रमांचा टप्पा ओलांडला होता. कला क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसताना कलेच्या क्षेत्रात स्वतःची वैशिष्टयपूर्ण शैली निर्माण केली. कायमच केवळ आणि केवळ रसिकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा आपला ध्यास म्हणजे मनोरंजनाव्दारे समाजसेवा करण्याचा वसा त्यांनी घेतला होता. त्यामुळेच अनाथ, अपंग, दृष्टीहीन, वृध्द , मूकबधिर आणि कर्करोग ,एचआयव्ही अश्या विविध व्याधींनी ग्रस्त असलेले रूग्ण यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी त्यांनी अनेक सामाजिक संस्था आणि रुग्णालयांमध्ये विना मोबदला आपली हास्यसेवा रुजू केली. तसेच भारतीय सैनिक आणि पोलीसांच्या तणावपूर्ण जीवनात हलक्या फुलक्या क्षणांची बरसात केली. ‘सरहद ‘ यांच्या तर्फे थेट कारगिलला जाऊन सिमेवर तैनात भारतीय सैनिकांचेही आपण मनोरंजन केले. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी आपल्या हास्यकलेने पुण्यातीलच नव्हे तर जगभरातील लोकांना हसवले होते. त्यांना हास्यवीर म्हणून संबोधले जायचे. नुकताच त्यांना यंदाचा विनोदोत्तम फांउडेशनतर्फे विनोदवीर पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. गेली ४० वर्षे ते थिएटर, टेलिव्हिजन आणि चित्रपटांमधून रसिकांचे मनोरंजन करत होते. तसेच त्यांचे सामाजिक काम देखील मोठे होते. अनेक कॅन्सरग्रस्तांसाठी, मूकबधीर, अनाथ, एचआयव्ही लोकांसाठी ते सतत कार्यरत होते. टीव्हीवर त्यांना काॅमिक सम्राट हा किताब त्यांना दिला होता. तो त्यांनी सार्थ ठरविला. ‘दुसरी गोष्ट’, कॅपचीनो, दगडाबाईची चाळट, प्रेमा, सरगम आदी चित्रपटांमधून त्यांनी अभिनयाची झलक दाखवली होती. भारतातच नव्हे तर लंडन, इस्रायल, ओमान येथील रसिकांनाही त्यांनी हसवले आहे.

आपल्या ललितकला म्हणजेच भारतीय संगीत, नाटक , लोककला, अभिजात नृत्य या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या नवोदित कलाकारांना प्रोत्साहन आणि व्यासपीठ उपलब्ध करून या कलांच्या प्रसारासाठी चोरडिया यांनी २०२१ मध्ये‘ रंगकर्मी चोरडिया फाउंडेशन ‘ स्थापन केले होते. त्याचे संस्थापक अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading