Tuesday, July 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

महाज्योती : आक्षेपांच्या निराकरणानंतरच अंतिम निकाल

नागपूर : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर संस्थेमार्फत 25 व 26 ऑक्टोबर 2023 रोजी एमपीएससी (राज्यसेवा) पूर्व प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी एकूण 8 शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात आलेली होती. परीक्षेकरिता एकूण 39 हजार 786 उमेदवार पात्र होते. यामध्ये 19 हजार 173 उमेदवारांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली. ‘महाज्योती’ने (राज्यसेवा) प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेच्या उत्तरपत्रिका प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांकडून आक्षेप मागविलेले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेल्या आक्षेप परीक्षा घेणाऱ्या एजन्सीला पाठविण्यात आले व आवश्यक त्या सुधारणा करून अंतिम उत्तरपत्रिका तयार करण्यात आल्याची माहिती महाज्योती प्रशासनातर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
एमपीएससी (राज्यसेवा) प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी एकूण 8 शिफ्टमध्ये या परीक्षा घेण्यात आल्याने गुणांचे सामान्यीकरण (नॉरमल्याझेशन) करण्यात आल्याचे परीक्षा एजन्सीने कळविलेले आहे. गुणांचे सामन्यीकरण करण्याकरिता परीक्षा घेणाऱ्या एजन्सीने भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या रेल्वे भरती बोर्डद्वारे वापरण्यात येणाऱ्या गुणांच्या नॉरमल्याझेशन सुत्रांचा वापर करण्यात आल्याचेही महाज्योतीद्वारे सांगण्यात आले आहे.

भरती बोर्डाच्या नॉर्मलायझेशन फॉर्मुलाचा वापर

उपरोक्त सर्व बाबींच्या स्पष्टीकरणासह 25 व 26 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या एमपीएससी (राज्यसेवा) प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेचा परीक्षेतील बैठक क्रमांकानुसार निकाल महाज्योतीने 11 नोव्हेंबर 2023 रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेला होता. मात्र परीक्षा काही विद्यार्थ्यांचे गुणांचे नॉरमल्याझेशन हे 200 गुणांपेक्षा अधिक आले. तर काही विद्यार्थ्यांचे नकारात्मक गुण आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. याबाबत परीक्षा घेणाऱ्या एजन्सीकडे चौकशी केली असता, परीक्षा एजन्सीने गुणांचे नॉरमल्याझेशन योग्य रीतीने केलेले आहे असे सांगितले आहे. या प्रक्रियेत वर नमूद केलेल्या सूत्रानुसार गुणांचे सामान्यीकरण हे सरासरी तत्वावर होत असल्याने जितक्या गुणांची परीक्षा त्यापेक्षा अधिक जाऊ शकते व नकारात्मक देखील येऊ शकते. त्यामुळे परीक्षेचा निकाल हा योग्यच आहे असे परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेने स्पष्टीकरण सादर केले असल्याचेही महाज्योतीने सांगितले आहे. विद्यार्थ्यांना निकालाबाबत कोणत्याही प्रकारची शंका राहू नये म्हणून वेबसाईटवरून गुणपत्रिका हटविण्यात आलेली आहे. तज्ञांकडून नॉर्मलायझेशन फॉर्मुला बरोबर असल्याची खात्री करून घेऊन पुन:श्च निकाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे, विद्यार्थ्यांनी याबाबत कोणतीही शंका मनात बाळगू नये असे आवाहन ‘महाज्योती’मार्फत करण्यात येत आहे. महाज्योतीमार्फत विद्यार्थ्यांच्या मनात शंका राहू नये यासाठी त्यांना परीक्षेत प्राप्त झालेले एकूण गुण व गुणांचे सामान्यीकरण केल्यानंतर येणारे गुण असे दोन्ही बाबी नमूद करून सुधारित निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे महाज्योतीने संकेतस्थळावरून निकाल काढून टाकला म्हणून निकालात गोंधळ झाला असा निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही, असेही महाज्योती प्रशासनाने कळविले आहे.

सुधारित निकालासह प्रारूप निकाल प्रसिद्ध होणार

विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमामुळे निकाल विद्यार्थ्यांना समजेल अश्या पद्धतीने लावण्यासाठी निकालाची शहानिशा तज्ञांकडून करून घेण्याचे कार्य प्रगती पथावर आहे. तसेच विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या परीक्षेत किती गुण प्राप्त झाले व गुणांचे सामान्यीकरण केल्यानंतरच येणारे गुण प्राप्त होतात याची माहिती निकालाद्वारे देण्यात येणार आहे. सुधारित निकाल प्रसिद्ध करताना प्रारूप निकाल प्रसिद्ध करण्यात येईल, त्यावर विद्यार्थ्यांचे आक्षेप मागविण्यात येतील व संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करूनच अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी निकालाबाबत मनात कोणतीही शंका मनात बाळगू नये असे आवाहन महाज्योतीमार्फत करण्यात येत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading