मिरासदारांचे कथाकथन हे स्टोरीटेलिंगचा आदर्श : योगेश सोमण
पुणे : प्रा. द. मा. मिरासदार यांच्या लेखनात शब्दप्रभुत्वाप्रमाणेच, त्यांच्यातील दृष्यत्मक आकलनाचे सामर्थ्य प्रभावी आहे. त्यांच्या कथाकथनाचे हे श्राव्यरूप स्टोरीटेलिंगचा आदर्श ठरेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध नाटककार, अभिनेते आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी रविवारी येथे केले.
ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि दमांचे बंधू ज्येष्ठ लेखक वसंत मिरासदार यांच्या ९५ व्या जन्मदिनाचे औचित्य साधून द. मा. मिरासदार प्रतिष्ठान आणि स्टोरीटेल यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित कार्यक्रमात मिरासदार यांच्या मूळ आवाजातील आठ कथा ऑडिओ बुक्स स्वरूपात स्टोरीटेलवर प्रकाशित करण्यात आल्या. यावेळी सोमण अध्यक्षपदावरून बोलत होते. शिवाजीचे हस्ताक्षर, फुकट, भुताचा जन्म, ९९ बादची एक सफर, साक्षीदार, नदीकाठचा प्रकार, धडपडणारी मुले आणि व्यंकुची शिकवणी, अशा दमांच्या ८ कथांचे श्राव्यरूप यावेळी स्टोरीटेलच्या वतीने प्रकाशित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य भाजपचे सरचिटणीस आणि पुणे पुस्तक महोत्सवाचे संचालक राजेश पांडे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्टोरीटेलचे इंडिया हेड योगेश दशरथ, निमंत्रक रवींद्र मंकणी, हरी मिरासदार, वसंत मिरासदार, मसापचे स्थानिक कार्यवाह प्रसाद मिरासदार आणि स्थानिक कार्यवाह सुनेत्रा मंकणी आदी मान्यवर उपस्थित होते. टिळक रस्त्यावरील साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम झाला.
सोमण म्हणाले, दमांच्या लेखनाचा परिचय पुस्तकांमधूनच झाला. चित्रपटांसाठी काम करताना कथा – पटकथा – संवादांच्या संदर्भात एक डाव भुताचा हा चित्रपट पाहताना, त्याचे लेखन दमांचे असल्याचे लक्षात आले आणि त्यांच्यातील व्हिज्युअलायझर किती प्रभावी आहे, हे जाणवले. दमांचे कथाकथन ऐकताना, स्टोरीटेलिंगचा ते आदर्श होते, हे समजले. विनोद म्हणजे स्टॅड अप कॉमेडी, असे आजचे समीकरण असताना, दमांच्या कथाकथनाचा वारसा पुढे नेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
राजेश पांडे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पुण्याचे अध्यक्ष असलेले दमा, किती संवेदनशील होते, याच्या आठवणी जागवल्या. विद्यार्थी परिषदेसाठी कथाकथनाचे कार्यक्रम विना मोबदला ते करत असत, समाजातील हीण संपावे आणि राष्ट्रीय विचारांचा पुरस्कार व्हावा, म्हणून ते आग्रही असत आणि प्रसंगी स्पष्ट भूमिका घेत, असे पांडे म्हणाले. दमांनी निखळ आनंद समाजात पोहोचवला, ज्याची आज फार गरज आहे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात समाजात आनंदवृद्धी करणारे उपक्रम होतील, असेही ते म्हणाले.
वसंत मिरासदार म्हणाले, खिरापतीचा आणि कुरापतीचा, असे विनोदाचे दोन प्रकार आहेत. दमांचा विनोद खिरापतीचा होता. उपरोध आणि उपहास, त्यांनी केला नाही. तू परिहास विनोद कर, हा चि. वि. जोशी यांचा सल्ला त्यांनी मानला आणि शुद्ध, निर्भेळ मनोरंजन करणारा विनोद स्वीकारला. शालेय वयापासूनच त्यांच्यात एक खट्याळपणा होता, याचे किस्सेही वसंत मिरासदार यांनी ऐकवले. आज ९५ व्या वर्षीही मला लिहावेसे वाटते. मला जगावेसे वाटते. नव्या पिढीशी नाते जुळवावे असे वाटते, असेही ते म्हणाले.
योगेश दशरथ म्हणाले, स्टोरीटेलिंग या माध्यमासाठी दमांच्या कथा आणि त्यांचे कथाकथन, अतिशय योग्य आणि हवेहवेसे आहे. त्यांच्या कथनातील प्रभावीपणा मजा आणतो. आज श्राव्य पुस्तकांचा एक निश्चित असा श्रोता निर्माण झाला आहे. मिरासदार कुटुंबियांनी दमांचे हे ध्वनिमुद्रण वेळीच करून ठेवले, याचे विशेष कौतुक आहे.
प्रास्ताविकात प्रसाद मिरासदार यांनी दमांच्या सहवासात आनंदाने जगण्याची ताकद मिळाल्याचा उल्लेख केला. मंगला मिरासदार यांनी वसंत मिरासदार यांच्या वाढदिवसानिमित्त संस्कृतमधील रचना सादर केली. हरिभाऊ मिरासदार यांनी परिचय करून दिला. दमांच्या आवाजातील भुताचा जन्म या कथेचा अंशही ऐकविण्यात आला. हरी मिरासदार यांनी आभार मानले तर सुनेत्रा मंकणी यांनी सूत्रसंचालन केले.
