Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRA

साने गुरुजी, बहिणाबाईंच्या मातीतील साहित्य संमेलन दिशादर्शक ठरणार : डॉ. रविंद्र शोभणे

साने गुरूजी साहित्य नगरी, अमळनेर : पुज्य साने गुरुजी व बहिणाबाई चौधरी यांच्या मातीत होत असलेले ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येणाऱ्या काळात महाराष्ट्राला दिशादर्शक ठरेल, असा विश्वास संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रा.डॉ. रविंद्र शोभणे यांनी व्यक्त केला. बहिणाबाई चौधरींनी मराठी साहित्याला सोन्याचा हंडा दिला आहे. आजही बहिणाबाईंच्या कवितेच्या पलिकडे ग्रामीण कविता गेल्या नाही, हे अभिमानानं नमूद करावसं वाटतं, असंही ते म्हणाले. डॉ. रविंद्र शोभणे यांनी संमेलनाच्या तयारीचा पूर्व आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रताप महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देत महाविद्यालय परिसराची पाहणी केली. यावेळी मराठी वाङ्‌मय मंडळ, अमळनेरचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी व कार्यकारी मंडळ सदस्यांनी संमेलन अध्यक्षांना सविस्तर माहिती दिली.

मराठी वाङ्‌मय मंडळ, अमळनेर द्वारा आयोजित ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि.२, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळेनर येथील पू. साने गुरूजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. यापार्श्वभूमीवर प्रा. डॉ. रविंद्र शोभणे यांनी प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे भेट दिली. सर्वप्रथम त्यांनी पुज्य साने गुरुजी स्मृती कक्षास भेट देवून सानेगुरुजींना वंदन केले. त्यानंतर संमेलन स्थळ सभागृह क्रमांक १ व २ येथे पाहणी करुन काही सुचना केल्या. त्यानंतर डॉ.शोभणे यांनी कवी कट्टा, साहित्य / पुस्तक प्रकाशन पॉईंट, बुकस्टॉल, निवास व्यवस्था पाहणी केली. सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत ते प्रत्यक्ष जागेवर जावून सर्व बाबी जाणून घेतल्या.

यानंतर बोलतांना डॉ.शोभणे म्हणाले की, आपण शेजारी शेजारी आहोत. विदर्भ संपला की खान्देश सुरु होतो. त्यामुळे विदर्भावर खान्देशाचं किती प्रेम आहे, याची प्रचिती मला येतेय. कुठं एक विदर्भातील माणूस खान्देशातील तेही साने गुरुजींच्या भूमीतील समेंलनाच्या अध्यक्षस्थानी विराजमान होतोय, याबद्दल बोलण्यास माझ्याकडे शब्दच नाहीत. बहिणाबाई चौधरींनी मराठी साहित्याला सोन्याचा हंडा दिला आहे. यामुळं हे साहित्य संमेलन यशस्वी होईल, याचा विश्वास आहे. जळगावकरांच्या प्रेमाने मी खरोखरचं भारावलो गेलो आहे, असंही ते म्हणाले.

यावेळी खान्देश शिक्षण मंडळातर्फे डॉ.शोभणे यांना सत्कार करण्यात आला. या छोटेखानी कार्यक्रमाला संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.अनिल शिंदे, कार्योपाध्यक्ष प्रदिप अग्रवाल, सदस्य हरी वाणी, संदेश गुजराथी, कल्यार पाटील, विनोद पाटील, निरज अग्रवाल, योगेश मुंदडे, प्रा.डॉ.ए.बी.जैन, मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.रविंद्र मोरे यांच्यासह मराठी वाङ्‌मय मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी, उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह सोमनाथ ब्रह्मे, नरेंद्र निकुंभ, शरद सोनवणे, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, कार्यकारणी सदस्य प्रा.डॉ.पी.बी.भराटे, बन्सीलाल भागवत, स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर, प्रा.डॉ.सुरेश महेश्वरी, प्रा.श्याम पवार, प्रा.शीला पाटील, स्विकृत सदस्य अजय केले, बजरंगलाल अग्रवाल, ग्रंथपाल हेमंत बाळापूरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading