Thursday, June 4, 2026
Latest NewsPUNE

‘कळसूबाई’ सह १५१ गडांवर भगव्या स्वराज्यध्वजासह स्वराज्यगुढी 

पुणे : महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमता: महाराष्ट्रातील तब्बल १५१ गडांवर, १५१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी, तसेच महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर कळसूबाई येथे भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. प्रत्येक गडांशी निगडीत असलेल्या वीर स्वराज्यघराण्यांचे वंशज आणि परिसरातील ग्रामस्थ, वीर मावळे यांच्या हस्ते तसेच प्रत्येक मंडळाशी निगडीत असलेल्या कार्यकर्ते आणि परिसरातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला.
शिवजयंती महोत्सव समितीचे गिर्यारोहण विभागाचे समन्वयक एव्हरेस्ट वीर भगवान चवले यांच्या मार्गदर्शनाखाली ओम काकडे, सतीश घोडे. अजिंक्य बांगर यांनी कळसूबाई या महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावर मोहिम फत्ते केली. गड तिथे शिवस्वराज्य दिन, गणेशोत्सव मंडळ तिथे शिवस्वराज्य दिन, शिखर तिथे शिवस्वराज्य दिन सोहळ्याचे संकल्पक तसेच शिवजयंती महोत्सव समितीचे आद्यप्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले.

शिवनेरी, तोरणा, राजगड, सिंहगड, रायरेश्वर, तुंग, तिकोणा, पुरंदर, रोहिडेश्वर, पन्हाळा, रामशेज, संग्रामदुर्ग, लोहगड, रोहिडा, मल्हारगड, राजमाची, विसापूर, इंदुरी, मोरगिरी, कोरीगड, घनगड, कैलासगड, तैलबैला, सोनेरी, वज्रगड, केंजळगड, मोहनगड, कावळा, वैराटगड, चंदनगड, वंदनगड, कमळगड, पांडवगड, कलनिधी, विशाळगड,भुदरगड, सामानगड, भैरवगड, जीवधन, वसंतगड या किल्ल्यासह १५१ गडांवर हा सोहळा साजरा झाला. तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ, छत्रपती राजाराम मंडळ, तुळशीबाग मंडळ, शनी मारुती बाल गणेश मित्र मंडळ, सेवा मित्र मंडळ, साईनाथ मंडळ यासह पुण्यातील १५१ मंडळांनी हा सोहळा साजरा केला.

अमित गायकवाड म्हणाले, ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षात महाराष्ट्रातील सर्व शिखरांवर ६ जून हा शिवस्वराज्य दिन शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून साजरा करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्रातील महत्वांच्या शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळां मध्ये जागृती करुन त्यांचाही सहभाग या सोहळ्यामध्ये वाढवुन खऱ्या अर्थाने शिवरायांना सार्वजनिक रित्या व्यापक मानंवदना दिली जात आहे.

शिवस्वराज्यदिन विश्वव्यापी होण्यासाठी आम्ही ६ जून २०१३ साला पासून भगव्या स्वराज्यध्वजा सह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी प्रत्येक गडावर, घरावर, चौकात, गावात, शहरात, राज्यात तसेच देशविदेशात उभारुन साजरा करत आहोत. शिवरायांचा जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, वाघनखे, शिवमुद्रा या पंचशुभ चिन्हांनी अलंकृत भगवा स्वराज्यध्वज निर्माण करण्यात आला आहे.

कार्यक्रमाचे आयोजन सोहळयाचे संकल्पक अमित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र कंक, सागर पवार, गणेश जाधव, अशोक सरपाटील, सचिन पवार, नितीन पंडित, चंद्रकांत गायकवाड यासह असंख्य स्वराज बांधवांनी  केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading